सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत, पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. “उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात पण ती कार जेव्हा चालवत असतात तेव्हा सगळं ट्राफिक थांबलेलं असतं,” असं ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत.

“सरकारचं स्टेअरिंग कोणाच्या हाती?,” उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य

“उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात पण ती कार जेव्हा चालवत असतात तेव्हा सगळं ट्राफिक थांबलेलं असतं. त्यामुळे ती कार व्यवस्थित चालते. असं सरकार चालवता येत नाही. ट्राफिक सुरुच राहतो सरकारकडे …त्यामुळे त्यासंदर्भात जनता योग्य उत्तर देत असल्याचं मला वाटत आहे,” असा टोला फडणवीसांनी ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या निमित्ताने लगावला.

उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं आहे –
“माझ्या हाती राज्याचं स्टेअरिंग भक्कम आहे,” असं उद्घव ठाकरे यांनी म्हटलं आहे. “मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत, पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही,” असंही सूचक विधान यावेळी त्यांनी केलं. परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ व्या राज्य रस्ता सुरक्षा महिन्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यातील अपघातग्रस्त जागा, वळणे लक्षात घेऊन अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, “सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत, पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, माझ्या हाती स्टेअरिंग भक्कम आहे. माझ्या हाती राज्याचं स्टेअरिंग भक्कम आहे”. पुढे ते म्हणाले की, “कार आणि सरकार दोन्ही व्यवस्थित सुरु आहे. पुढे कोण बसलं आहे आणि मागे कोण बसलं आहेहे महत्वाचं नाही. कार आणि सरकार दोन्ही सुरळीत सुरु आहे. सर्वजण मिळून काम करत आहोत”.