भाजप नेते बबनराव पाचपुते यांच्या मालकीचा साखर कारखाना शनिवारी पंजाब नॅशनल बँकेकडून तत्वत: ताब्यात घेण्यात आला. माजी मंत्री बबनराव पाचपुतेंना हा मोठा तडाखा मानला जात आहे. नगर जिल्हय़ातील श्रीगोंदा तालुक्यामधील हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्याने ऊस देयकांची थकवलेली रक्कम शेतकऱ्यांना न दिल्याने या कारखान्याच्या मालमत्तेवर जप्ती आणण्यास दिलेल्या स्थगितीस मुदतवाढ देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यापूर्वीच नकार दिला होता. त्यामुळे या कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. अखेर आज पंजाब नॅशनल बँकेने पावणे चारशे कोटीच्या वसुलीसाठी कारखान्यावर तत्वत: ताब मिळवला. या कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा मिळविण्यासाठी बँकेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बबनराव पाचपुते यांना तारण ठेवलेला दैवदैठणचा कारखाना आणि श्रीगोंद्यातील घरही गमवावे लागणार आहे. कमळ काळवंडतेय? शेतकऱ्यांच्या ऊस देयकांच्या थकबाकीमुळे हा कारखाना नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिला होता. साईकृपा कारखान्याने जानेवारी २०१५ पासून गाळप केलेल्या उसाची ३८ कोटी २५ लाख रुपयांची देणी थकविली होती. ही रक्कम देण्यास साखर आयुक्तांनी आदेशित केले होते. रक्कम वसूल होत नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी मालमत्ता विक्री करून शेतकऱ्यांची रक्कम परत करण्याचे जुलै महिन्यात कळविण्यात आले होते. साखर आयुक्तांच्या या आदेशाला सहकारमंत्र्यांनी २६ फेब्रुवारीला स्थगिती दिली होती. त्या विरोधात जामखेड, करमाळा, परंडा, कर्जत व फलटण येथील शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होते.