“हिंमत असेल तर महाविकास आघाडीचं उद्या कशाला आजच पाडून दाखवा असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिलं आहे. इतकंच नाही तर ऑपरेशन लोटस काय तुम्हालाच लोटलं ना लोकांनी” असं म्हणून भाजपाच्या ऑपरेशन लोटसचीही त्यांनी खिल्ली उडवली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून हे सरकार फार काळ टीकणार नाही अशी टीका भाजपाने वारंवार केली. त्या टीकेला आज उद्धव ठाकरेंनी थेट आव्हान देत हिंमत असल्यास उद्या नाही आजच महाविकास आघाडीचं सरकार पाडून दाखवा असं म्हटलं आहे. मुक्ताई नगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आपल्या भाषणात त्यांनी एकनाथ खडसे यांनाही टोला लगावला. “मुक्ताई नगर मुक्त झालं आहे. कुणापासून ते तुम्हाला चांगलंच माहित आहे. तुम्हीच त्यांना बाजूला केलं आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र त्यानंतर भाजपाकडून सातत्याने या सरकारवर टीका केली जाते आहे. हे तीन पक्षांचं सरकार म्हणजे ऑटो रिक्षा आहे. हे सरकार फार काळ चालणार नाही. सरकारविरोधात आम्ही ऑपरेशन लोटस राबवणार असं भाजपा नेत्यांकडून म्हटलं गेलं आहे. या सगळ्या टीकेला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं.

ऑपरेशन लोटस काय म्हणतात.. मला माहित नाही. पण ते ऑपरेशन लोटस काय तुम्हालाच जनतेने लोटलं ना? असा प्रश्न विचारत हिंमत असल्यास महाविकास आघाडीचं सरकार पाडून दाखवा असं थेट आव्हानच उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिलं. आता भाजपाचे इतर नेते किंवा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यावर काही प्रतिक्रिया देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.