महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला काँग्रेसचा फक्त पाठिंबा आहे. एखादे सरकार चालवणे आणि सरकारला पाठिंबा देणे या दोन्हीमध्ये फरक असल्याचे वक्तव्य राहुल यांनी केल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात होते. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचं म्हटलं आहे.

“राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. ही चर्चा भाजपाकडून मुद्दामहून घडत आहे. राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.

दरम्यान महाविकास आघाडीसंदर्भात केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांनी बुधवारी फोनवरून संवाद साधला. काँग्रेस पूर्णत: महाविकास आघाडीच्या पाठीशी असून करोनाविरोधातील लढय़ात सरकारला सर्वप्रकारे सहाय्य केले जाईल, असे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले.

राहुल गांधी यांच्या विधानावरून राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारमधील कथित मतभेदांवर तर्कवितर्क केले गेले. आपण केलेल्या विधानाचा कोणताही गैरअर्थ नसून राज्य सरकार करोनाविरोधातील लढ्यात योग्य काम करत असल्याचे राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. आघाडीत काँग्रेसशी दुजाभाव केला जाणार नाही. पक्षाला सन्मानाची वागणूक मिळेल. निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सहभागी करून घेतले जाईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना दिले.