केंद्राकडे दोन हजार टन प्राणवायू पुरवठ्याची मागणी

जालना : ब्रेक द चेन हा सध्याचा पंधरा दिवसांचा कालावधी वाढवायचा किंवा नाही याचा निर्णय त्यावेळेची करोनाची परिस्थिती पाहून राज्य सरकार घेईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी येथे सांगितले.

टोपे म्हणाले की, मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. यामुळे अनेकांना आर्थिक अडचणी येणार असल्या तरी जनतेचा जीव वाचविण्यास प्राधान्य देऊन हे निर्बंध घालावे लागले आहेत. करोनाची साठ हजार रुग्णांपर्यंत दररोज पोहोचणारी संख्या कमी व्हावी यासाठी जनतेने निर्बंधाच्या काळात सरकारला सहकार्य करून संक्रमण आणि संसर्ग टाळावा, अशी विनंती केली आहे. सध्याच्या निर्बंधाचे १५ दिवस एकदा संपू द्या. मग त्या वेळी काय परिस्थिती राहील ते पाहून निर्बंधांचा कालावधी वाढवायचा किंवा नाही याचा निर्णय घेण्यात येईल.

केंद्राच्या मदतीमुळे राज्यास प्राणवायूचा पुरवठा सुरू झाला आहे. आज शनिवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासमवेत देशातील राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक झाली. महाराष्ट्राने केंद्राकडे दोन हजार टन प्राणवायूचा पुरवठ्याची मागणी केली आहे. सध्याच्या परिस्थितीत दररोज पाचशे टन तरी प्राणवायूची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा आहे. छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा राज्यांतून प्राणवायूचा पुरवठा सुरू होत असून रेल्वेच्या माध्यमातून तो राज्यात आणण्याचा विचार आहे. कामाच्या ठिकाणी लसीकरण करण्याचा औद्योगिक जगताच्या मागणीचा राज्य सरकारने विचार केला आहे. हवेतून प्राणवायू घेण्याचा प्रयोग राबविण्याच्या संदर्भात राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या असल्याचेही टोपे यांनी या वेळी सांगितले.