शेतकरी संपामुळे राज्यातील वातावरण तापले असतानाच सोलापुरात कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत त्यानं मुख्यमंत्री आल्याशिवाय माझं प्रेत जाळू नका, असं म्हटलं आहे. करमाळा तालुक्यात घडलेल्या या घटनेने शेतकरी आंदोलन आणखी तापण्याची शक्यता आहे. धनाजी चंद्रकांत जाधव (वय ४५) असं या शेतकऱ्याचं नाव असून, ते करमाळा तालुक्यातील वीट या गावात राहत होते. वीट येथील जांभूळझरा येथील वस्तीवर राहणारे धनाजी चंद्रकांत जाधव यांच्यावर सावकार व बँकेचे कर्ज होते. धनाजी यांनी शेतकरी संपात व आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी वस्तीनजीक असलेल्या लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यावेळी धनाजी यांच्या खिशातून चिठ्ठी निघाली असून त्या चिठ्ठीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत नाहीत, तोपर्यंत मला जाळायचं नाही, असे स्पष्टपणे लिहिले आहे. आत्महत्या केलेले शेतकरी धनाजी जाधव यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन मुले असा परिवार आहे. एक मुलगा बारावी व दुसरा दहावीला आहे. कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन पेटले असताना वीटमध्ये धनाजी जाधव याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. धनाजी जाधव यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात रात्री उशिरा नेण्यात आला. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, धनाजी जाधव यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळे या भागात तणाव वाढला असतानाच करमाळा शहर व तालुक्यात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. दरम्यान, घटनेचे गांभीर्य पाहून सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख हे तातडीने करमाळ्यात दाखल झाले. त्यांनी धनाजी जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि फोनवरून त्यांना मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून दिला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाधव यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना त्यांना मदतीचे आश्वासन दिले. धनाजी जाधव यांची दोन एकर शेती असल्यामुळे ते अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या गटात मोडतात. त्यामुळे सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार त्यांचे कर्ज माफच होईल. याशिवाय, त्यांच्या मुलांच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलेल. तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी एक लाख रूपयांची आर्थिक मदत जाधव कुटुंबियांना देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर जाधव यांच्या कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्यामुळे करमाळ्यातील शेतकऱ्यांकडून आंदोलन मागे घेण्यात आले आहे.