भाजपातून बाहेर पडलेल्या एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश करत राजकीय सीमोल्लंघन केलं. ४० वर्षानंतर भाजपातून आलेल्या खडसे यांचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वागत केलं. मात्र, दुसरीकडे खडसे यांच्या प्रवेशावर काही नेते नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. या चर्चेला शरद पवार यांनी आज पूर्णविराम दिला.

एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार असल्याची चर्चा त्यांच्या प्रवेश करण्याच्या निर्णयापासून सुरू झाली होती. यात राज्य मंत्रिमंडळात असलेल्या काही मंत्र्यांचे खातेबदल केले जाणार असल्याची चर्चाही सुरू होती. राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या चर्चेला शरद पवार यांनी पूर्णविराम दिला.

आणखी वाचा- एकनाथ खडसे म्हणाले, “पवार साहेब, मी तुम्हाला शब्द देतो की…”

एकनाथ खडसे यांनी प्रवेश केल्यानंतर बोलताना शरद पवार यांनी भाष्य केलं. पवार म्हणाले,”गेल्या काही दिवसांपासून माध्यमं खडसे यांच्या प्रवेशाच्या बातम्या चालवत होते. आज काही तरी वेगळंच. मध्येच काहीतरी जाहीर करून टाकलं की, अजितदादा नाराज आहेत. अरे कशाला नाराज आहेत. असं आहे की, करोनाच्या संकटात प्रत्येकाची काळजी घ्यावी लागते. काळजी घेण्याच्या सूचना मी प्रत्येकाला दिल्या आहेत. जितेंद्र आव्हाड व्हेटिंलेटरवर होते. राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांना करोना झाला. त्यामुळे काळजी घेत आहोत. खबरदारी म्हणून काही सहकारी दिसले नाही म्हणून लगेच काहीतरी गडबड झाली. काहीही गडबड झालेली नाही.

आणखी वाचा- नाथाभाऊंमुळे राष्ट्रवादीची ताकद वाढेल- शरद पवार

“इतिहासाचा दुसरा टप्पा सुरू झालाय”

“खान्देश हा संपूर्ण परिसर गांधी-नेहरुंच्या विचाराचा होता. मध्यंतरी त्याला उतरती कळा लागली. या काळात नवी पिढी तयार झाली. ही पिढी घडवण्याचं काम नाथाभाऊंनी केलं. त्यांनी जिल्हा परिषद, खासदार, नगर परिषद, पंचायत समित्या आणल्या. इतिहासाचा हा पहिला टप्पा संपला आहे. आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे. नाथाभाऊ राष्ट्रवादीत आल्याने आता पक्षाला गती येईल. नाथाभाऊंनी खान्देशात पक्ष वाढवण्याचा शब्द दिला आहे. ते जेव्हा शब्द देतात, तेव्हा तो पूर्ण करतात. त्यावरून मागे हटत नाहीत. ही त्यांची खासियत आहे. आता करोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावर आपण जळगावात जाणार असून, नाथाभाऊ काय चीज आहे हे दाखवून देणार आहोत,” असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.