वर्धा : जो पक्ष आपल्या सिद्धांतावर व सामान्यांच्या व शेतकऱ्यांच्या विकासासाठी ठाम आहे, त्यांच्यासोबत माझी साथ आहे. तसेच मी भारतीय जनता पक्षाच्या आधी भारतीय जनतेचा आहे, असे प्रतिपादन खासदार व प्रसिद्ध चित्रपट अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केले.

स्थानिक दिवं. आमदार डॉ. शरदराव काळे स्मृती सेवाप्रतिष्ठान व जागृती क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. आशीष देशमुख, स्पर्धेचे मुख्य आयोजक आमदार अमर काळे आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना खासदार सिन्हा यांनी सिनेस्टाईल फटकेबाजी केली. ते म्हणाले, काही लोक साथ सोडून गेले. पण विजय मात्र सत्याचाच होईल, असे सिन्हा म्हणाले.

यावेळी आयोजक आमदार अमर काळे यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावे हा हेतू आहे. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाला शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षभेद विसरून उपस्थिती दर्शवली. हे सामान्यावरील प्रेमाचेच प्रतीक होय. माजी आमदार आशीष देशमुख यांनी वर्तमान स्थितीत समाजात मोठय़ा समस्या असून जो पक्ष शेतकऱ्यांचे हित साध्य करू शकत नाही, त्यांच्यासोबत राहणे मी नाकारल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.

आर्वीतील भारतरत्न राजीव गांधी स्टेडियमवर मोठय़ा संख्येने या स्पर्धा समारोपप्रसंगी युवक, महिला, ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती. स्पर्धेसाठी राज्यातील ३० पुरुष संघ व १५ महिलांचे नामवंत संघ स्पर्धेत सहभागी झाले होते.