करोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जीवावर उदार होऊन आपलं कर्तव्य निभावणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा विशेष पदकाने सन्मान करण्यात येणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत घोषणा केली आहे.

गृहमंत्र्यांनी यासंदर्भात ट्विट करुन करोनाविरुद्धच्या युद्धात लढणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची तुलना थेट चीनच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या शौर्याशी केली आहे. त्यांनी म्हटले की, “ज्या प्रकारे चीनविरोधात सीमेवर आपल्या सैनिकांनी जशी बहादुरी दाखवली आहे. त्याप्रकारे महाराष्ट्र पोलीस देखील करोनाविरुद्धच्या लढाईत दाखवत आहेत.”

“या कोविड १९ विरुद्धच्या लढाईत अगदी ग्रामपातळीपर्यंत पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या जिवाची पर्वा न करता कर्तव्य निभावले. त्या सर्व पोलिसांना ‘आपत्ती सेवा पदक’ देऊन त्यांचा यथोचित सन्मान-सत्कार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.”