सिंचन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

सिंचन घोटाळयात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समावेशासंदर्भात मुंबईच्या न्यायालयात सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही पवार यांच्या समावेशासंदर्भात भूमिका स्पष्ट करायला सांगितले आहे. त्यासंदर्भात लवकरच प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आज शनिवारी नागपुरात आयोजित दिवाळी मिलन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. या घोटाळयात अजित पवारांचा समावेश आहे किंवा नाही, अशी विचारणा नागपूर खंडपीठाने केली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारला असता ते म्हणाले, मुंबईतील न्यायालयात पवारांच्या समावेशासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. नागपूर खंडपीठातील प्रकरणात त्यासंदर्भात लवकरच प्रतिज्ञापत्र दाखल करून भूमिका स्पष्ट करण्यात येईल. याशिवाय सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर सरकारचा भर असून विद्यमान युती सरकारचा कार्यकाळ संपेपर्यंत अधिकाधिक प्रकल्प पूर्ण करण्यात येतील.

शिवसेनेचे भाजपप्रेम योग्यवेळी व्यक्त होईल

आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर  युती करण्यास आम्ही तयार आहोत. त्यामुळेच युतीवरील  प्रेम आम्ही वेळोवेळी प्रगट करत असतो. मात्र शिवसेनेचे भाजपवरील प्रेम लपून बसले आहे. परंतु काळजी करण्याची गरज नाही ते योग्य वेळी व्यक्त होईलच, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मातोश्रीवर बैठकीस हरकत नाही

युतीसाठी  मातोश्रीवर बैठक आयोजित केली तरी आमची हरकत नाही असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे हा प्रस्ताव युतीच्या काळात आला आणि तो केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यावेळी काही अडचणी आल्यामुळे त्यावर चर्चा झाली नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनापूर्वी व्हावा असा प्रयत्न राहणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमबरोबर युती केल्यामुळे त्याचा भाजपाला फायदा होईल असे काही नाही, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.