महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या कर सहायक पदासाठीच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका औरंगाबादमध्ये फुटल्याच्या चर्चेमुळे राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर रविवारी गोंधळाचे वातावरण होते. मात्र, परीक्षेनंतर केलेल्या पडताळणीत प्रश्नपत्रिका फुटली नसून व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणारी प्रश्नपत्रिका बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी विद्यार्थ्यांना  लाखो रुपयांना गंडविणाऱ्या सात जणांच्या टोळीसह १४ जणांना पोलिसांनी अटक केली, तर एक जण फरार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची बातमी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांना रविवारी पहाटे मिळाली. पहाटे साडेतीन वाजता औरंगाबाद येथील सिडको, एन-४ येथील पौर्णिक अपार्टमेंट, समृद्धीनगर येथे छापा टाकून बनावट प्रश्नपत्रिकेसह १४ मोबाइल, कार्डरेटर, संगणक, लॅपटॉप आदी साहित्य जप्त करण्यात आले. प्रतापसिंह महाजन काकरवाल (वय २८, रा. तळेगाववाडी, ता. भोकरदन, जि. जालना), मिर्झा मोहसुद्दीन मंजूर अहमद (वय २३, रा. वानखेडेनगर, हर्सूल, औरंगाबाद), अर्जुन भारत बमनावत (वय २१, रा. प्लॉट नं. १४, राजनगर, जटवाडा रोड, औरंगाबाद) यांसह श्रीनिवास नागनाथ बनसोडे यांनी प्रश्नपत्रिका देतो असे सांगून काही विद्यार्थ्यांबरोबर तब्बल ७५ लाख रुपयांचा व्यवहार ठरवला होता. त्यातील काही रक्कम आरोपींनी घेतली होती. श्रीनिवास बनसोडे या आरोपीने व्हॉट्सअ‍ॅपवर प्रश्नपत्रिका पुढे पाठवली. तो या प्रकरणात प्रमुख आरोपी असून अद्याप त्याला अटक झालेली नाही. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या प्रश्नपत्रिकांची परीक्षा संपल्यानंतर पडताळणी करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एल. चोरमारे व गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी प्रश्नपत्रिकेची व छाप्यात सापडलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली. मात्र, प्रश्नपत्रिकांमध्ये कोणतेही साम्य आढळले नसल्याचा दावा जिल्हाधिकारी विरेंद्र सिंग यांनी केली आहे. याबाबतची सर्व कागदपत्रे आणि या पडताळणी समितीचा अहवाल आयोगाला पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रश्नपत्रिका खरेदी करणाऱ्या कृष्णा चैनसिंग मारक (वय २६), ओमनाथ ऊर्फ किशोर काशिनाथ राठोड (वय २५, सर्व राहणार औरंगाबाद), संदीप कचरू मातेरे (वय २८, सिल्लोड), संदीप रामराव शिंदे (वय २७, सिल्लोड), भानुदास पुंडलिक बोर्डे (वय २४, रा. भोकरदन, जि. जालना), रोहित पुंजाराम गिरी (वय २९, रा. माणिकनगर, औरंगाबाद), नीलेश चिंतामण वाघ (वय २५, देवगाव, जि. जळगाव), गणेश पूनमचंद मैन (वय २९, औरंगाबाद), रामेश्वर अण्णा पवार (वय २४, औरंगाबाद), भोलेश्वर सुधाकर साबळे (वय २२, रा. पिंपळगाव, ता. भोकरदन, जि. जालना) या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.