जूनचे वेतन देण्यासाठी पैसे नाहीत; सरकारकडे ४५० कोटींची मागणी

मुंबई : टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाकडे दैनंदिन खर्च भागविण्याबरोबरच कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे वेतन देण्याइतके ही पैसे नसल्याने महामंडळाने राज्य सरकारकडे ४५० कोटी रुपये निधी देण्याची मागणी करण्याचे ठरविले आहे.

टाळेबंदी लागताच एसटीची राज्यांतर्गत सेवा बंद ठेवण्यात आली आणि दिवसाला मिळणारे २२ कोटी रुपये उत्पन्न बंद झाले. मुंबई, ठाणे, पालघर विभागांतर्गत अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी एसटी सेवा सुरू ठेवली, तर कामगारांसाठी एसटी चालवण्यात  आल्या. या दोन्ही सेवा मोफत होत्या. तर नुकतीच तालुका ते गाव ते तालुका एसटी सुरू करण्यात आली. मात्र त्याला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद आहे.

एकं दरीतच उत्पन्नच बुडाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन प्रश्न आणखी गंभीर झाला आहे. एसटीतील एक लाख कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे फक्त ५० टक्केच वेतन मिळाले. प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला वेतन होत असतानाही जून महिन्याचे जुलै महिन्यात मिळणारे वेतन अद्यापही झालेले नाही. वेतनाबरोबरच दैनंदिन खर्च भागवण्यासाठी महामंडळाने सरकारकडे आर्थिक मदत मागण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास ४५० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम शासनाकडे मागितली जाणार असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले.

एसटीत आर्थिक प्रश्न गंभीर असून वेतन देण्यासाठीही पैसे नाहीत. त्यामुळे पुढील आठवडय़ात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन एसटीला  मदत देण्यासंदर्भात चर्चा के ली जाईल. एसटीचा दैनंदिन खर्च पाहता एसटीला नेमकी किती मदत होईल यावरच चर्चा करून निर्णय होणार आहे.

-अनिल परब, परिवहनमंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष