शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील शाब्दीक वादावादीचे पडसाद आता रस्त्यावर उमटू लागले आहेत. शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही आक्रमक झाली आहे.

आज कोल्हापूरात अजित पवारांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक ५वर्षे का रेंगाळले ? हा माझा प्रश्न चुकीचा नव्हता. स्पष्ट बोलल्यानेच त्यांना कोल्हापुरी मिरची झोंबली, असा शिवसेनेवर पलटवार केला. त्यानंतर पुण्यातील अभिनव चौकात सामना ऑफिस समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली सामना पेपरच्या काही प्रती जाळण्यात आल्या.

सामना ऑफिस समोर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून शिवसैनिक देखील ऑफिस समोर आले आहेत. युवा एल्गार मेळावा संपल्यानंतर कोल्हापुरातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामनाच्या प्रतीचे दहन केले.

काय म्हटले शिवसेनेने
अजित पवारांची खोपडी रिकामी असून ते एक गटारी किडा आहे. गटारातील घाण पाण्यावर तो श्वास घेतो. भ्रष्टाचाराच्याच प्राणवायूवर जगतो. अशा व्यक्तीस आम्ही किंमत देत नाही, काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवारांच्या करंगळीवर तरलेला एकखांबी तंबू असून या तंबूचा कळस म्हणजे अजित पवारांची रिकामी खोपडी आहे. अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही, हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या ‘मुतऱ्या’ थोबाडाने बोलत असतात, अशा शब्दात शिवसेनेने त्यांच्यावर टीका केली.