आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा खिल्ली उडवत शिवसेनेवर टीका केली आहे. “हे सरकार गोंधळलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुट्टीवर गेले आहेत. ६० दिवसात काँग्रेस, राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना थकवलं आहे. त्यामुळेच ते तीन दिवस सुट्टीवर गेले आहेत. कॅबिनेटमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेतात. शिवसनेचे मंत्री हे टेबलवरील पेन आणि फाईल उचण्याचे काम करत असून, कॅबिनेटमध्ये कारकून सारखे बसलेले असतात,” असं म्हणत आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

मावळमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला. नितेश राणे म्हणाले, “राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थकवलं असल्याने ते सुट्टीवर गेले आहेत,” असा टोला नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते पण त्यांनी कधी सुट्टी घेतली, की नागपूरला सुट्टीवर गेले असं ऐकलं का? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या सहा वर्षांपासून सेवा करत आहेत. मात्र ते गुजरातला आईकडे सुट्टीवर गेले असं ऐकलं का? हे मुख्यमंत्री ६० दिवसातच थकले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीने त्यांना हैराण केले आहे. त्यामुळे थेट महाबळेश्वरला गेले आहेत. शिवसेनेचे सरकार कुठे आहे? शिवसेनेचे मंत्री, नेते हे कारकूनासारखे कॅबिनेटमध्ये असतात. निर्णय घेणारे हे सर्व काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आहेत. बाकी, टेबलवरील पेन आणि फाईल उचलण्याचे काम शिवसेनेचे मंत्री करतात,” असा टोमणा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला मारला.