साईबाबांचा जन्म पाथरीमध्ये झाला होता. त्यामुळे त्यामुळे साईबाबांचं जन्मस्थळ म्हणूनच पाथरीचा विकास व्हावा असा ठराव ग्रामस्थांचा ठराव पाथरीमध्ये पास करण्यात आला. आता पाथरीचे ग्रामस्थ याच संदर्भात उद्या म्हणजेच बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ होते त्याचा विकास त्याच अनुषंगाने करणार असल्याचं जाहीर केलं. ज्यामुळे वाद उफाळून आला होता. शिर्डीत कडकडीत बंदही पाळण्यात आला. ज्यानंतर सोमवारी शिर्डीतल्या ग्रामस्थांसोबत झालेल्या बैठकीत जन्मस्थळाबाबतचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी मागे घेतलं. आता या वादावर पडदा पडला असं वाटत असतानाच पाथरी येथील ग्रामस्थांनी ग्रामसभा घेत साईबाबांचा जन्म पाथरीतच झाल्याचा ठराव पास केला. आता याच संदर्भात पाथरीचे ग्रामस्थ उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत.

काय आहे प्रकरण?

पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ आहे. त्या अनुषंगाने पाथरीचा विकास करण्यात येईल. पाथरी गावासाठी १०० कोटींचा विकास आराखडा तयार असल्याचं वक्तव्यही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. ज्यानंतर वाद निर्माण झाला होता. शिर्डीमध्ये या वक्तव्याविरोधात पडसाद उमटले. रविवारी शिर्डी बंदचीही हाक देण्यात आली. त्यानंतर सोमवारी शिर्डीच्या ग्रामस्थांचं शिष्टमंडळ, पाथरीमधील गावकऱ्यांचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य मागे घेतलं.