संभाजीराव भिडे यांचे प्रतिपादन विश्वाच्या संघर्षांत भारताला हिंदुस्थान म्हणून स्थान निर्माण करून राष्ट्रप्रेम, राष्ट्रविचार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिले. त्यांचे ३२ मण सुवर्ण सिंहासन रायगडवर उभारण्यास देशभक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे गुरुवर्य संभाजीराव भिडे यांनी केले. देश निर्माणासाठी प्रखर राष्ट्रप्रेमासाठी आपल्या पूर्वजांचा इतिहास प्रत्येकाने अभ्यासावा, असे आवाहनही त्यांनी केले. हिंदवी स्वराज्याची प्रेरणा १२ व्या वर्षी छत्रपती शिवरायांना त्यांचे वडील शहाजींनी दिली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे सुपुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांनी प्रखर हिंदुत्व निर्माण केले. त्यांचे जीवन व अंतरंग प्रत्येकाने अभ्यासून आचरणात आणावे, असे संभाजीराव भिडे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्याच्या ३६ वर्षांत २८९ लढाया केल्या; मृत्यूच्या जबडय़ात ते वेळोवेळी सिंहासारखेच गेले. हिंदवी स्वराज्यासाठी आपले वडील शहाजी यांनी दिलेली प्रेरणा घेऊन त्यांनी रायरेश्वर येथे हिंदवी स्वराज्य निर्माण केले, असे भिडे गुरुजी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन सुपुत्र संभाजी महाराजांनी धर्मासाठी अतुलनीय काम केले. जीवनप्रवासात त्यांनी घाबरटपणा कधीही दाखविला नाही, असे भिडे यांनी गुरुजी म्हणाले. हिंदवी स्वराज्य निर्माण करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाचे रक्षण केले. हिंदू समाजात कायमच फुटिरता राहिल्याचा इतिहास छत्रपतींना माहीत असूनही त्यांच्यासह संभाजी महाराजांनी हिंदुस्थानचे संरक्षण केले. महाभारत, छत्रपतींचा इतिहास प्रत्येकाने अभ्यासावा, असे आवाहन करून आपणास पूर्वजांचा इतिहास माहिती नसल्याने प्रेरणा मिळत नाही, असे भिडे गुरुजींनी सांगितले. छत्रपतींचा हिंदुस्थान ३३ कोटी जनतेचा होता आणि आज लोकसंख्या १२३ कोटी आहे. हिंदुस्थानचा इतिहास पाहता २७ वेळा फाळणी झाली आहे. हिंदुस्थान मोठे राष्ट्र होते. पण कालांतराने त्याचे तुकडे पडत गेले. आजही चीन आपला मित्र आहे किंवा नाही हे ठरविले जात नाही. तसेच हिंदू समाजाला मित्र कोण आणि शत्रू कोण याची कल्पना नाही. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट, अंतरंगाचा अभ्यास करावा लागेल, असे भिडे गुरुजी म्हणाले. यावेळी गुरुवर्य संभाजीराव भिडे यांनी हिंदुस्थानचा इतिहास मांडला आणि छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करून हिंदुस्थानला राष्ट्रप्रेम, धर्मनिष्ठा दाखविली. पण आज हिंदूंना राष्ट्रीयत्व व हिंदुत्वाची प्रखर जाणीव नाही, अशी खंत भिडे गुरुजींनी व्यक्त केली. यावेळी अमोल साटेलकर, श्रीपाद सावंत, कदम आदींनी स्वागत केले. भिडे गुरुजींचे विचार ऐकण्यासाठी भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली, राजू मसूरकर हजर होते.