राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सनातनच्या हिटलिस्टवर असल्याच्या श्याम मानव यांच्या आरोपाला सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी सोमवारी प्रत्युत्तर दिले. श्याम मानव हे मनोरूग्ण असून त्यांना विश्रांतीची गरज आहे, अशी टीका अभय वर्तक यांनी सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले, अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कारभाराची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी केली पाहिजे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी श्याम मानव काहीही बोलतात. सनातनला बदनाम करण्यासाठी काही शक्ती कार्यरत आहेत. केवळ हिंदू द्वेष हेच त्यांच्या आरोपांचे मूळ कारण आहे. शेषराव मोरे यांनी पुरोगामित्वाचे चेहरे उघड केले असून, पुरोगामी लेखकांकडून पुरस्कार परत करण्याची भूमिका केवळ प्रसिद्धीसाठी आहे. या लेखकांनी शासकीय कोट्यातील घरे का परत केलेले नाहीत, असाही प्रश्न त्यांनी विचारला.
काश्मीरमध्ये हिंदूंवर झालेले अत्याचार, काँग्रेसच्या काळात शीखांवर केले गेलेले अत्याचार या लोकांना दिसले नाहीत का, असे विचारून केवळ विचार लेखन आणि भाषण स्वातंत्र्याची ढाल करून हिंदूविरोधी लेखन केले की तो विवेक आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.