येत्या आठदहा दिवसांत शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू होईल, असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीपूर्वी हे काम सुरू झाले असते, तर मतांमध्ये ५ टक्के आणखी फरक पडला असता, असे म्हणत त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना कोपरखळी मारली. मात्र, येत्या काही दिवसांत हे काम सुरू करतानाच समांतर जलवाहिनीचे कामही आचारसंहितेपूर्वी मार्गी लागेल, असेही ते म्हणाले.
शहरातील टीव्ही सेंटर येथे क्रीडासंकुल उभारताना ५२ दुकाने उभारण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. भुयारी गटार योजनेच्या ठेकेदारास कार्यारंभ आदेश दिल्याची माहितीही या कार्यक्रमात देण्यात आली. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून शहरातील भूमिगत गटार योजनेसाठी ३६५ कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर त्याचे राजकीय श्रेय खैरे नेहमीच घेतात, तर रखडलेल्या समांतर जलवाहिनीच्या कामातील प्रमुख अडथळा मुख्यमंत्र्यांचा असल्याचेही नेहमीच सांगतात. बुधवारी एका कार्यक्रमात मात्र हे दोन्ही प्रकल्प लवकरच मार्गी लागतील, असे ते म्हणाले.
टीव्ही सेंटर भागातील व्यापारी कृती समितीने शिवाजी पुतळ्याजवळील कोपऱ्यात क्रीडासंकुल व गाळे उभारण्यासाठी महापालिकेकडे पसेही भरले होते. व्यापाऱ्यांनी दिलेल्या रकमेतून ४ कोटी १२ लाख रुपयांत ३ हजार आसनक्षमतेचे स्टेडियम व ५२ गाळे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमातून महापालिकेला ८ कोटी फायदा होईल, असा दावा केला जात आहे. असे उपक्रम शहरात इतर ठिकाणी हाती घेता येऊ शकतील, अशी सूचना औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी केली. ती खैरे यांनीही उचलून धरली. मात्र, शहरातील महापालिकेकडील मोकळ्या जागेच्या मालमत्ता नोंदी नसल्याने अडचण निर्माण होते. वारंवार सांगूनही पीआर कार्डला नोंदी नसल्याने गोंधळ होत असल्याचे सांगत खैरे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा विभाग अधिक सक्षम करावा, अशी सूचना केली. शहरातील रस्त्यांसाठी ५०० कोटींचा निधी मिळावा, असे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. औद्योगिक विकास वेगाने होत असल्याने रस्त्यांसाठी निधी मिळावा, अशी मागणी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली असल्याचे ते म्हणाले.
धार्मिक स्थळांबाबत बैठकीची सूचना
न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील कारवाई सुरूकरण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने िहदू-मुस्लीम बांधवांची बठक घ्यावी, अशी सूचना खैरे यांनी केली. काही मंदिरे रस्त्यावर असल्याने ती अतिक्रमणे समजून काढण्याचे निर्देश मुंबई न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. मंगळवारी न्यायालयाने या विषयी पुन्हा विचारणा केली. त्यामुळे बठक घ्यावी, अशी सूचना खैरे यांनी केली. या पूर्वी त्यांनी या कारवाईच्या विरोधात सूर आळविला होता. आता मात्र बठक घेऊन सामंजस्याने मार्ग काढण्यासाठी बठक घ्या, अशी सूचना त्यांनी बुधवारी केली.