गुलालाची उधळण,अक्षता, सनई-चौघडय़ासह वऱ्हाडी मंडळींची उपस्थिती आजपर्यंत अनेक विवाह सोहळे झाले, होतील. पण जर देवदेवतेचा विवाह असेल तर.. असाच एक विवाह सोहळा पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विवाह संपन्न झाला तोही शाही पद्धतीने. मंगल अक्षता, सनई चौघडे आणि उपस्थित वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत देवाला शुभ्र पोशाख करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा आहे. त्यानुसार देवाला पांढराशुभ्र पोशाख परिधान करण्यात आला. वसंत पंचमीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह झाला होता, असा उल्लेख एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवरात केला आहे. हा विवाह सोहळा पूर्वी उत्पात समाज करीत होते. त्यानंतर आता मंदिर समिती श्री विठ्ठल मंदिरात तर उत्पात समाज वशिष्ठ आश्रम येथे या दिवशी हा सोहळा करून परंपरा जपत आहे. हा विवाह सोहळा दिमाखदार करण्यासाठी म्हणून संपूर्ण देऊळ विविध रंगीबेरंगी फुलांनी सजवले जाते. सकाळी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीला शुभ्र वस्त्र तर रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने, नथ, हिरवा चुडा आणि शुभ्र अलंकारांनी सजवले जाते. साधारणत: सकाळी अकरा वाजता रुक्मिणी मातेच्या गर्भागृहातून गुलाल श्री विठ्ठलाकडे नेला जातो. तिथे गुलालाची उधळण होते. त्यानंतर विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे घेऊन जातात. तिथेही गुलालाची उधळण होते. त्यानंतर श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचे अलंकाराने सजवलेली उत्सवमूर्ती या विवाह सोहळय़ाच्या ठिकाणी आणली जाते. दोघांनाही मुंडावळय़ा बांधून आणल्या जातात. यानंतर अंतरपाट धरला जातो. उपस्थितांना फुले आणि अक्षता वाटप केले जाते आणि मग सुरू होतात मंगलाष्टका. आता सावध सावधान.. ही मंगलाष्टक म्हटल्यावर सर्व उपस्थित टाळय़ा वाजवून आणि टाळ-मृदुंगाच्या जयघोषात आपल्या लाडक्या देवाचा विवाह सोहळा पूर्ण करतात. यंदाच्या या सोहळय़ास मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, मंदिर समितीचे सदस्य यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. हा विवाह सोहळा झाल्यावर सायंकाळी दोन्ही मूर्तीची नगरामधून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. वसंतातील सोहळा वास्तविक पाहता शिशिर ऋतू म्हणजे थंडी संपून वसंताच्या आगमनाचा काळ. सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. वसंत ऋतूच्या आगमनाने सर्व सृष्टी फुलून जाते. सर्वत्र चतन्याचे वातावरण तयार होते. यामध्ये आजचा दिवस रती आणि कामदेवाच्या पूजेचा असल्याचे मानले जाते. वसंत ऋतूच्या आगमनाने सर्व सृष्टीमध्ये चतन्य आलेले असते. यामुळे या काळातील वसंतपंचमी ते रंगपंचमी दरम्यान विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडतो. आगामी उन्हाळय़ाची चाहूल लक्षात घेऊनच या वेळी विठ्ठलाला पांढरे वस्त्र घातले जाते. या काळात महिनाभर दररोज गुलालाची उधळण भगवंताच्या अंगावर केली जाते.