शहापूर तालुक्यातील किनव्हली परिसरातील वेहळोली येथील धरणाच्या पाण्यावर काकडी आणि भेंडीचे पीक घेणारे अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. या धरणातून गेल्या १५ दिवसांपासून पाणी न सोडण्यात आल्याने अंदाजे ५० ते ६० एकर भागातील पीक करपून गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांना अर्थिक नुकसान होत आहे.शहापूर तालुक्यातील वेहळोली (निमसे) धरणातील पाणी वाचकोले, शिवाजीनगर या धरणाखालील गावांना सिंचनासाठी सोडण्यात येते. या पाण्यावर येथील ५० ते ६० एकर क्षेत्रातील शेतकरी काकडी आणि भेंडीची लागवड करुन दुबार पीक घेतात. मात्र लघुपाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी मागील १५ दिवसांपासून धरणातील पाणी न सोडल्याने पीकांची नासाडी होत असल्याचे वाचकोले येथील एका शेतकऱ्याने सांगितले. यामुळे लवकरात लवकर धरणांतून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.याबाबत लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता आर.जी.विसपूते यांच्याशी संपर्क साधला असता शेतकऱ्यांकडून कोणतीही मागणी करण्यात आली नसल्याने पाणी सोडले नसल्याने त्यांनी सांगितले.