जिल्ह्यातील शिक्षकांचे एप्रिल व मे महिन्यांचे पगार अजून झाले नाहीत. पगार नसल्याने शिक्षक मंडळी अडचणीत असून, या प्रश्नावर सोमवारी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.
प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाल्यांच्या पुढील शिक्षणाचे शुल्क भरणे, टय़ुशन शुल्क, गणवेश, पुस्तकांचा खर्च, काही कर्मचारी शेतीशी निगडित आहेत, त्यामुळे त्यांचे खरीप हंगामासाठी खते, बियाणे खर्च असे प्रश्न निर्माण झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ऑनलाईनच्या नावाखाली प्रत्येक महिन्याचा पगार २० तारखेच्या आसपास होत आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाला कर्जाच्या व्याजाचा भरुदड भरावा लागत आहे. ऑनलाईनच्या नावाखाली केंद्रीय मुख्याध्यापकांऐवजी मुख्याध्यापकांना वेठीस धरले जात आहे. बिल काढण्यासाठी प्रत्येक शिक्षकाला ५० ते १०० रुपये द्यावे लागतात यांसह अनेक प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाले आहेत. या प्रश्नांवर लवकरच तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा प्राथमिक शिक्षक संघाने दिला आहे.