२७ अश्वशक्ती पेक्षा अधिक विजेचा जोरभार असलेल्या यंत्रमागधारकांची सवलत रद्द करण्याचा निर्णय वस्त्रोद्योग विभागाने घेतल्यानंतर टीकेची झोड उठविण्यात आली होती. याची उपरती झाल्यानंतर सोमवारी वीज सवलत बंद करण्याच्या निर्णयास स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केला केला असून, यामुळे यंत्रमागधारकांना दिलासा मिळाला आहे. २७ अश्वशक्ती पेक्षा जास्त जोडभार असलेल्या यंत्रमागधारकांना वीज सवलत दिली जाते. वीज सवलत देण्यासाठी राज्य शासन दरवर्षी सुमारे २२०० कोटी रुपये खर्च करीत असते. ही सवलत कायम ठेवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक केली होती. मात्र ही प्रक्रिया क्लिष्ट असल्याने यंत्रमागधारकांना अडचणी येत होत्या. तरीही वस्त्रोद्योग आयुक्तांनी २९ डिसेंबर रोजी ९७० वस्त्रोद्योग घटक वगळून उर्वरित सुमारे १० हजार यंत्रमागधारकांची वीज सवलत तत्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावर राज्यभरातील यंत्रमागधारक आणि त्यांच्या संघटनांनी टीकेची भडीमार केला होता. त्यानंतर रविवारी इचलकरंजी येथे झालेल्या यंत्रमागधारकांच्या संवाद कार्यक्रम प्रसंगी वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार आज(सोमवार) अपर सचिव विशाल मदने यांनी वीज सवलत पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून महावितरणला तत्काळ अवगत केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.