दरवर्षीप्रमाणे यंदा देखील राज्यभरात १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार आहे. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारकडून शिवजंयतीवर काही निर्बंध घालण्यात आले असून, साधेपणाने शिवजयंती साजरी केली जावी असे आवाहन करण्यात आले आहे. यावरून भाजापने आक्रमक भूमिका घेतली असून, महाविकासआघआडी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. परिणामी राज्यसरकारकडून शिवजयंती संदर्भात नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना विकणारे, शिवस्मारकात भ्रष्टाचार करणारे, नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांबरोबर करणाऱ्या छिंदम प्रवृत्तीच्या भाजपाने महाराजांच्या जयंतीबाबत आम्हाला शिकवण देऊ नये. त्यांनी मोदींचा वाढदिवस साजरा करावा. करोनाचा संकटकाळ आहे हे विसरता कामा नये. असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.”

तसेच, “शिवराय हे रयतेचे राजे होते. शिवराय आमचे आदर्श आहेत. आमच्या हृदयात आहेत. रयत संकटात असताना त्यांनी जी भूमिका घेतली असती तीच महाविकासआघाडी सरकार घेत आहे. शिवरायांचा राजधर्म हाच होता. दाढी वाढवून स्वतःची शिवरायांबरोबर तुलना करणाऱ्या गोळवलकरांच्या शिष्यांना तो कळणार नाही. असा टोला देखील सावंत यांनी भाजपाला लगावला आहे.”

भाजपाच्या विरोधानंतर ठाकरे सरकारचं एक पाऊल मागे, शिवजयंतीसाठी नवी नियमावली केली जाहीर

राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्यासाठी सर्वप्रथम गुरुवार (११ फेब्रुवारी) रोजी नियमावली जारी केली होती. त्यात काही निर्बंध घालण्यात आले होते. यावरुन भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर राज्य सरकारने  नव्याने नियमावली जाहीर केली आहे. आधी फक्त १० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली होती, पण आता १०० जणांना परवानगी देण्यात आली आहे.

आणखी वाचा- “भायखळ्याला पेंग्विन पहायला १६ फेब्रुवारीपासून याचचं हं!,” आशिष शेलारांचा टोला

भाजपाने केली होती टीका :-
“सत्तेसाठी शिवसेनेने अनेकदा काँग्रेस – राष्ट्रवादी पुढे लोटांगण घातले आहे. आता शिवजयंती साजरी करण्यावर बंधने घालून शिवसेनेने ‘घालीन लोटांगण, वंदीन चरण’ चा नवा प्रयोग सादर केला आहे. ‘हिंदू समाज सडा हुवा है’ असं म्हणणाऱ्या शर्जिल व एल्गार परिषदेच्या कार्यक्रमाला ठाकरे सरकारकडून पायघड्या अंथरल्या जातात, मात्र छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करायला राज्य सरकार बंधनं घालतं. पोवाडे, बाईक रॅली, मिरवणूका यावर आघाडी सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. दारूची दुकाने, नाईटलाइफ, बार सुरु करण्यास परवानगी देताना सरकार गर्दीचा विचार करीत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात करोनाच्या नावाखाली अनेक अडचणी सांगितल्या जात आहेत” अशी टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली होती.