राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने भाजपाला साथ दिली नसती तर भाजपाला राज्यात केवळ ४० ते ५० जागा मिळवता आल्या असत्या असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. भाजपाला राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या १०५ जागांवर विजय मिळवला आहे त्यामध्ये शिवसेनेचं फार मोठं योगदान असल्याचं मत पवारांनी व्यक्त केलं आहे. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली, या मुलाखतीत पवारांनी भाजपाने मित्र पक्षाला गृहित धरण्याची भूमिका अयोग्य असल्याचं मत व्यक्त केलं.

“लोकशाहीमध्ये १०५ जागा असणारा प्रमुख पक्ष राज्यात सरकार स्थापन करु शकला नाही. यासंदर्भात तुमचं काय मत आहे,” असा प्रश्न राऊत यांनी शरद पवारांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी भाजपाने १०५ पर्यंत कशी मजल मारली हे पाहणं महत्वाचं असल्याचं म्हटलं आहे. “मुळात प्रमुख पक्ष प्रमुख कसा झाला याच्या खोलात जायला पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे, १०५ हा जो आकडा आहे त्यामध्ये शिवसेनेचं योगदान फार मोठं होतं. त्यामध्ये शिवसेना सहभागी नसती. किंवा शिवसेनेला त्यामधून वजा केलं तर तो १०५ जागांचा आकडा ४०-५० च्या आसपास असता. भाजपाचे काही नेते जे १०५ असं सांगत असतात. मात्र त्यांना १०५ वर पोहचवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनाच जर गृहित धरण्याची भूमिका घेतली तर मला वाटतं नाही वेगळं काही करण्याची गरज होती,” असं मत पवारांनी व्यक्त केलं आहे.

नक्की वाचा >> बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमध्ये ‘हा’ मोठा फरक आहे : शरद पवार

त्या बातम्या खोट्या

लॉकउनसंदर्भातील भूमिकेवरुन पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मतभेद होते यासंदर्भातील बातम्यांवरील प्रश्नावरुन पवारांनी प्रसारमाध्यमांना टोला लगावला. “लॉकडाउनमुळे आम्हाला घराच्या बाहेर पडता येत नाही. बरीचशी काम करता येत नाहीत. अनेक अ‍ॅक्टीव्हीटी थांबल्या आहेत. आणि या अ‍ॅक्टीव्ही थांबल्याचा परिणाम जसे वेगवेगळ्या घटकांवर झाले तसे वृत्तपत्रांवर झालं. मुख्य म्हणजे त्यांना जे वृत्त हवं असतं ते वृत्त देणारे कार्यक्रम कमी झाले. म्हणून मग जागाभरण्यासाठी अशा बातम्या दिल्या गेल्या. याच्यात आणि त्याच्यात नाराजी आहे. मीच मागील काही दिवसांपासून वाचतोय की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत वाद आहेत. पण हे यत्किंचितही सत्य नाही.  पण त्यात सत्य नाही,” असं पवारांनी स्पष्ट केलं आहे.