देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्याची पुर्वतयारी म्हणून काँग्रेस पक्षाच्या बांधणीसाठी ‘भारत जोडो यात्रे’चं आयोजन करण्यात आलं आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही यात्रा होणार आहे. या यात्रेवर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली ही ‘भारत जोडो यात्रा’ नसून, ती ‘भारत तोडो यात्रा’ आहे, अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान शिवसेनेला मिळालं आहे. यावरती विचारले असता, “दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळायला पाहिजे होतं. कारण खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे. एकनाथ शिंदे आमच्यासमवेत असल्यामुळे आणि बहुसंख्य लोक त्यांच्याकडे असल्याने शिवसेना खरी त्यांची आहे,” असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं.

“सुरुवातीला त्यांच्या झेंड्यामध्ये निळा, हिरवा…”

मंत्री आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “राज ठाकरेंनी हिंदू-मुस्लिम यांच्यात वाद लावू नयेत. सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची भूमिका असावी. सुरुवातीला त्यांच्या झेंड्यामध्ये निळा, हिरवा आणि भगवा रंग होता. आता त्यांनी सगळे रंग बदलले आहेत.”

हेही वाचा – “शिवसेनेच्या व्यासपीठावर चारच लोक दिसतील” बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका!

“लोकसभेत ४०० पेक्षा जास्त जागा जिंकू”

“राहुल गांधींच्या नेतृत्वात निघालेली ही ‘भारत जोडो यात्रा’ नसून ती ‘भारत तोडो यात्रा’ आहे. भारत जोडण्यापेक्षा त्यांनी आपला पक्ष जोडला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना करणं बच्चों का खेल नही है. लोकसभेत ४०० पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचा आमचा निर्धार आहे,” असेही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो व्हायरल, अभिजीत बिचुकलेंचा इशारा; म्हणाले, “मी हे सहन…”

“…तर आम्ही बारामतीची जागा निवडून आणू शकतो”

“चांगलं काम केलं तर आम्ही बारामतीची जागा निवडून आणू शकतो. या मतदारसंघामध्ये दलित, धनगर, मराठ समाजाची संख्या मोठी आहे. ओबीसींचा देखील आम्हाला पाठिंबा असल्याने ती जागा नक्की निवडून आणू शकतो,” असा दावा रामदास आठवलेंनी केला आहे.