यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलेला पृथ्वीराज पाटील यास पारितोषिकाची रक्कम मिळाली नसल्याने त्याची चर्चा रंगली असताना, राज्याचा राजकीय आखाडा बनलेल्या कोल्हापुरात पृथ्वीराजच्या मदतीवरून आज (रविवारी) दिवसभर राजकीय धोबीपछाड पाहायला मिळाली. शासनाने मदत केली नसली तरी भाजपा पाठोपाठ महाविकास आघाडीच्या नेत्याकडून पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. PHOTOS : अंतिम क्षणापर्यंत रंगला महाराष्ट्र केसरी-२०२२ चा थरार; कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील ठरला मानकरी! कुस्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या मल्लांनी एकेकाळी महाराष्ट्र केसरी, हिंद केसरीवर आपले नाव कोरले होते. पृथ्वीराजच्या रूपाने काल कोल्हापूरकडे मानाची चांदीची गदा आली. मात्र पारितोषिकाची दोन लाख रुपयांची रक्कम मिळाली नसल्याने स्पर्धेच्या प्रतिष्ठेला धक्का बसला. खुद्द पृथ्वीराजने समाज माध्यमातून या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केल्याने पारितोषिकावरून टीकाटिपणी रंगली. Maharashtra Kesari 2022 : तब्बल २१ वर्षांनंतर कोल्हापूरला मिळाली ‘महाराष्ट्र केसरी’ची मानाची गदा! याचवेळी कोल्हापुरातही याच मुद्द्यावरून राजकीय धोबीपछाड सुरू झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराजचे अभिनंदन करून भाजपच्यावतीने पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. स्वाभाविकच महाविकास आघाडी याबाबत काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या सभेत पृथ्वीराजचे अभिनंदन करतानाच मुद्दा राजकीय रिंगणाकडे वळवला. राजकीय पक्षांच्या कुस्त्या सुरू झाल्या तर आपल्या समोर लढायला कोणी मर्द नाही. पण कुस्तीमध्ये भाजपा उतरला तर समोरच्या पैलवानाशी कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी त्याच्यावर ईडी, सीबीआय इत्यादींच्या धाडी येतील. त्यामुळे मर्दाने मर्दासारखे कसं लढायचं हे कोल्हापूरची माती शिकवेल, असा उल्लेख करीत कुस्तीचा संदर्भ तपास यंत्रणांशी जोडला. मात्र त्यांनी महाराष्ट्र केसरी पारितोषिकाची रक्कम वा विशेष बक्षिसाची रक्कम याबद्दल काहीच भाष्य केले नाही. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजला मिळाली केवळ मानाची गदा, बक्षिसाची रक्कम नाही! दरम्यान, सभा संपल्यानंतर कशी नी काय सूत्रे हलली ते समजले नाही; पण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी पृथ्वीराजला पाच लाख रुपयांचे बक्षीस देत असल्याचे जाहीर केले. यातूनच महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या निमित्ताने परस्परांना शह -काटशह देण्याचे राजकारण रंगल्याचे पाहून कोल्हापूरकरांना निवडणुकीची धामधूम संपताना राजकीय कुस्तीतून मनोरंजन पाहायला मिळाले. तर कुस्ती शौकिनांनी महाराष्ट्र केसरीची पारितोषिकाची रक्कम मिळाली नसली, तरी त्याच्या पाचपट राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या निमित्ताने का असेना मदत जाहीर केल्याबद्दल समाधानकारक प्रतिक्रिया नोंदवल्या.