करोना विषाणून संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. भारतातील स्थितीही चिंताजनक वळणावर जात असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारनं गर्दी रोखण्यासाठी तातडीनं राज्यातील नागरी भागात जमावबंदी आदेश लागू केले. त्याचबरोबर जनतेनं घरातच थांबून सहकार्य करावं असं आवाहनही केलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही लोकांचं मनोबल वाढवण्यासाठी खास ट्विट केलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यूची हाक दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी जनतेला संबोधित करताना राज्यातील नागरी भागात कलम १४४ लागू करत असल्याची घोषणा केली. तसेच जनतेनं सरकारला सहकार्य करावं, असं आवाहनही केलं होतं. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ३१ मार्चपर्यंत राज्यात जमावबंदी असेल अशी माहिती दिली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. करोनाशी मुकाबला करण्यासाठी लोकांनी घरातच थांबावं असं आवाहन केलं आहे. तसेच भीती आणि अफवाच्या काळात नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण असताना रोहित पवार यांनी नवाजुद्दीन सिद्दीकीची मुख्य भूमिका असलेल्या 'मांझी- द माऊंटन मॅन' या सिनेमातील एक संवाद ट्विट करत लोकांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. रोहित पवार काय म्हणाले? 'नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या 'मांझी- द माऊंटन मॅन' या चित्रपटातील "जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं" हा माझा एक आवडता डायलॉग आहे. आजही वेगळ्या अर्थाने याच डायलॉगप्रमाणे वागण्याची गरज आहे. जोपर्यंत कोरोना पराभूत होत नाही, तोपर्यंत आम्ही लढत राहणार! या विषाणूविरोधातील लढाईसाठी तुमचाही असाच एखादा डायलॉग असेल तर सांगा, त्यातील काही मी RT (रिट्विट) देखील करेल!,' असं आवाहन रोहित पवारांनी केलं आहे. @Nawazuddin_S यांच्या 'मांझी- द माऊंटन मॅन' या चित्रपटातील "जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं" हा माझा एक आवडता डायलॉग आहे. आजही वेगळ्या अर्थाने याच डायलॉगप्रमाणे वागण्याची गरज आहे. जोपर्यंत कोरोना पराभूत होत नाही, तोपर्यंत आम्ही लढत राहणार!#IndiaFightsCorona pic.twitter.com/taQneizm5t — Rohit Pawar (@RRPSpeaks) March 23, 2020 आणखी वाचा- ‘लॉकडाऊन’बाबत अमित ठाकरे म्हणतात… राज्य सरकारला विनंती राज्यातील वाढत्या करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याच्या अनुषंगानं रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे, शरद पवार यांना एक विनंती केली आहे. 'सरकारी हॉस्पिटलमधील सर्व पेशंट खासगी हॉस्पिटलमध्ये हलवून त्याचा भार सरकारने उचलला, तर सर्व सरकारी हॉस्पिटल कोरोनाच्या पेशंटसाठी राखीव ठेवता येतील. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हे गरजेचं आहे. कृपया याकडे लक्ष द्यावं ही विनंती,' असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.