औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्‍यान एका तरूणाची भोसकून हत्‍या करण्‍यात आल्याची बाब उघड झाली आहे. शहरातील क्रांती चौक भागात ही खळबळजनक घटना घडली. मिरवणूक संपल्यानंतर रात्री दीड वाजण्याच्‍या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. जुन्या वादातून ही हत्‍या झाली असल्‍याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर दोन्‍ही आरोपी फरार आहेत.

सुत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, आशिष साळवे असे मृत तरूणाचे नाव आहे. तो रमानगर भागातील रहिवाशी आहे. सहा महिन्यांपुर्वी एका लग्‍नाच्‍या वरातीत मयत आशिष आणि संशयीत आरोपी अविनाश जाधव व कुनाल जाधव यांचे भांडण झाले होते. याच जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी आशिषला १४ एप्रिल रोजी गुप्‍तीने भोकसले. यात आशिष गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी घाटी रुग्‍णालयात दाखल केले मात्र, डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेनंतर दोन्‍ही संशयीत आरोपी फरार झाले आहेत. क्राती चौक पोलिसात गुन्‍हा नोंदवण्‍याची प्रक्रिया सुरू होती.