नाशिकमधील कामटवाडा परिसरामध्ये पूर्ववैमनस्यातून एका घराबाहेर लावण्यात आलेल्या तीन दुचाकी गुरुवारी रात्री जाळण्यात आल्या. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामटवाडा परिसरामध्ये रमेश दळवी यांचे घर आहे. त्यांच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या तीन दुचाकी गाड्या गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास जाळण्यात आल्या. आगीचे लोट थेट दळवी यांच्या घरापर्यंत पोहोचेल्यावर त्यांना घडलेल्या घटनेची माहिती झाली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या साह्याने आग विझवण्यात आली. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी शुक्रवारी सकाळी चौघा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येते आहे.