आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी राज्यभर दौऱ्यांना सुरुवात केली आहे. त्यानिमित्ताने ते आज बुलढाण्यात होते. बुलढण्यातील जनतेशी संवाद साधताना त्यांनी माता जिजाऊंचाही उल्लेख केला. तसंच, सत्ताधाऱ्यांची हुकुमशाही आणि एकाधिकारशाही उलथवून लावण्यासाठी एकत्र या, असं आवाहनही त्यांनी केलं. ते म्हणाले, "महाराष्ट्राची जिद्द गेली कुठे? बुलढाणा आपण म्हणतो की सिंदखेड राजा म्हणजे जिजाऊंचं जन्मस्थान. जिजाऊंनी आपल्याला एवढं मोठं दैवत दिलं, त्यांना आपण विसरलो. अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द ज्या दैवताने दिली त्यांचं मातृस्थान या जिल्ह्यात आहे. आणि त्या जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येला वळत असेल आणि गद्दार टिमकी वाजवत असेल तर बुलढणाकरांना तरी जिजाऊंचं नाव घेण्याची योग्यता नाही. जिजाऊलाही समाधान वाटलं पाहिजे की मी ज्या तेजाला जन्म दिला त्याचा प्रकाश संपूर्ण देशावर पडला. पण मी जिथे जन्मले तिथेच प्रकाश पडणार नसेल तर उपयोग काय माझ्या आयुष्याचा? कशाला म्हणायचं जय जिजाऊ.." हेही वाचा >> अजित पवारांना कुटुंबात एकटं पाडलं जातंय का?, रोहित पवार म्हणाले, “साहेबांनी बांधलेल्या घरातून…” जय शाह विराट कोहलीचा प्रशिक्षक होता काय? "भाजपावाले जे म्हणताय की ते घराणेशाहीच्या विरुद्ध आहेत, पण आम्ही तुमच्या एकाधिकारशाही आणि हुकुमशाहीच्याविरोधात आहोत. मुख्यमंत्री पद म्हणजे बीसीसीआयचं अध्यक्षपद नाही की तुम्ही जसं तिथे जय शाहाला बसवलं. माझं घराणं अगदी प्रबोधनकारांपासून महाराष्ट्रासमोर आहे. अमित शाह, तुमचं असं क्रिकेटमधलं काय योगदान आहे? जय शाह विराट कोहलीचा प्रशिक्षक होता का? मुंबईमधील मॅच अहमदाबादला नेणं एवढंच त्याचं कर्तृत्त्व?", अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली. "अशोक चव्हाण, अजित पवार तिथे गेले. जुने काँग्रेसवाले पुन्हा हवे असतील तर भाजपाला मतदान करा, अशी काही टॅगलाईन आहे की काय. भाजपाला मतदान करा, जुने काँग्रेसवाले आमदार-खासदार करा. हा प्रश्न तुम्हाला सर्वांना विचारतो, ही लढाई माझ्या एकट्याची नाही. तुमच्या पुढच्या पिढ्या लोकशाहीत राहावीत असं वाटतं की हुकुमशाहीत जगावी असं वाटतं त्याला मतदान करा", असंही ठाकरे म्हणाले. "ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी काही संबंध नव्हता, त्यांच्या पदरात पुन्हा भारतमाता टाकणार का? ते जर टाकायचं नसेल तर इथून फक्त आपल्या शिवसेनेलाच मतदान करा. त्यांची शिवेसना मी मानत नाही. कोणीतरी माझ्या आजोबांनी पक्षाला दिलेलं नाव त्यांना देत असेल तर ही लोकशाही आहे. आणि लोकशाहीच्या अधिकारात मी निवडणूक आयोगाचं नावच बदलतो. धोंड्या आजपासून तो. ही आमची शिवसेना आणि ही आमचीच आहे", अशीही टीका ठाकरेंनी केली.