जिल्ह्यातून वाहत असलेल्या तापी नदीतून होणारा वाळू उपसा न थांबविल्यास भविष्यात शेतीसाठी काय पण पिण्यासाठीही पाणी शिल्लक राहणार नाही, असा इशारा तापी बचाव समितीच्या वतीने विभागीय महसूल आयुक्त रवींद्र जाधव यांना निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. वाळू उपसा बंद करण्यासंदर्भात संबंधितांना निर्देश दिले जातील, अशी ग्वाही आयुक्तांनी समितीला दिली आहे.
जिल्हा प्रशासनाने मार्चच्या पहिल्या आठवडय़ात शिंदखेडा तालुक्यातील तापी काठावरील जुने कोळदे, लंघाणे, साहूर, अक्कडसे आणि हिसपूर या ठिकाणी वाळू उपशाचा ठेका दिला. या ठेक्यातून प्रशासनाला ३१ लाखापासून दोन कोटी १३ लाख रुपयापर्यंतचा महसूल मिळाला. प्रशासनाच्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन करून ठेकेदारांनी एकाच दिवसात सुमारे २०० ब्रास वाळू वाहून नेली. प्रशासनाने जितकी वाळू उपसण्याचा ठेका दिला होता, तितकी वाळू एका आठवडय़ात उपसली जाईल, अशी यंत्रणा ठेकेदारांनी वापरली. हा ठेका ३१ जुलैपर्यंत देण्यात आला असून अशा पद्धतीने वाळू उपसण्यामुळे नदी पात्रातील संपूर्ण वाळूच उपसली जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वाळू उपसा बंद होण्यासाठी तापी बचाव समितीने दाद मागणे सुरू केले आहे. समितीचे प्रमुख समन्वयक ज्ञानेश्वर भामरे यांचे पुत्र नगरसेवक रविराज भामरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जुने कोळदे येथे काही गावगुंडांनी धमकावले. शुक्रवारी समितीचे ज्ञानेश्वर भामरे, हेमंत मदाने, दिलीप कोळी यांनी विभागीय आयुक्तांची भेट घेऊन बेसुमार वाळू उपशासंदर्भात माहिती दिली. तहसीलदारांना थेट कारवाई करण्याचे आदेश दिले जातील, असे आश्वासन जाधव यांनी दिले. दरम्यान समितीच्या सदस्यांना धमकाविण्याच्या प्रकाराचा गावांगावांमधून निषेध होत आहे.