माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी २०२० मध्ये भारत महासत्ता बनेल असं म्हटलं होतं. कलामांच्या या विधानांचा राजकीय व्यासपीठावर अनेकदा उल्लेख होताना दिसतो. विशेषतः विकासाचा मुद्दा आल्यानंतर देशाला महासत्ता करण्याबद्दल भाष्य केलं जातं. भाजपाच्या नेत्यानीही मोदींच्या नेतृत्वात देश महासत्ता होईल, असं म्हटलेलं आहे. याच विधानावरून हवाला देत काँग्रेसचे नेते आमदार भाई जगताप यांनी भाजपाला चिमटा काढला आहे.

काँग्रेसचे नेते आमदार भाई जगताप हे ट्विटवरून सातत्यानं मोदी सरकार व भाजपावर शेलक्या शब्दात निशाणा साधताना दिसत आहे. उपहासात्मक टीकेतून ते सरकारच्या धोरणांवर निशाणा साधत आहेत. जगताप यांनी नव्यानं एक ट्विट करत भाजपाला टोला लगावला आहे. “मोदीजी पंतप्रधान झाले तर २०२० पर्यंत भारत महासत्ता बनेल, असं म्हणणाऱ्यांकडे आता फक्त ३९ दिवस राहिलेत… महासत्ता देश विकून होता येत नाही,” असा चिमटा भाई जगताप यांनी भाजपा नेत्यांसह समर्थकांना काढला आहे.

भाई जगताप यांचे भाजपावर टीका करणारे काही ट्विट

“जोपर्यंत लस नाही, तोपर्यंत दुर्लक्ष नको. सतत हात धुवत राहा. कधी नोकरीपासून, कधी पगारापासून, कधी निवृत्ती वेतनापासून, तर कधी व्यवसायापासून,” असं म्हणत जगताप यांनी मोदी सरकारवर टीका केली.

“महावितरण आणि अदानी दोन्ही वीजपुरवठा करतात, पण भाजपाचा मोर्चा फक्त महावितरण कार्यालयावर. दुतोंडी भाजपाई महाराष्ट्र द्रोह्यांना शेठजींची मैत्री आड येते का?,” असा सवाल करत जगताप यांनी भाजपानं महावितरणच्या कार्यालयावर काढलेल्या मोर्चावर निशाणा साधला होता.