जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा या गावानजीकच्या महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. आज दुपारी साधारण साडेचार वाजेच्यासुमारास खासगी वाहन व ट्रक यांच्यात हा भीषण अपघात झाला.

एरंडोलकडून जळगावकडे किमान दहा ते बारा प्रवासी घेऊन जाणाऱ्या जीपला, विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला. या ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून ट्रक थेट समोरून येणाऱ्या जीपला धडकला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे घडलेल्या भीषण अपघातात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर जखमींना तातडीने एरंडोलच्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र दुर्देवाने रुग्णालयात उपचारादरम्यान आणखी तीन जणांचा मृत्यू झाला.

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय मृतांचा आकडा वाढण्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे.