काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्यापही करोना संकट टळलं नसताना शाळा सुरु करण्यासंबंधी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेत शाळा सुरु केल्यानंतर जे संकट निर्माण झालं तीच परिस्थिती आपल्याकडे उद्भवली तर काय कऱणार ? अशी विचारणा त्यांनी केली आहे. सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या बैठकीत काँग्रेसचे चार आणि तर इतर पक्षांचे तीन मुख्यमंत्री सहभागी झाले,

उद्धव ठाकरे यांनी बैठकीत बोलताना म्हटलं की, “अमेरिकेत शाळा सुरु केल्यानंतर ९७ हजार मुलांना करोनाची लागण झाल्याचे रिपोर्ट आहेत. जर आपल्याकडे अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय करणार आहोत?”. राज्यातील लॉकडाउन शिथील केला जात असतानाही शाळा मात्र बंद ठेवण्यात आल्या आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं. केंद्र सरकारला घाबरायचं की त्यांच्यासोबत लढायचं याचा निर्णय आपल्याला घ्यायचा असल्याचंही ते यावेळी म्हणाले आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी बैठकीत बोलताना सांगितलं की, “परिस्थिती अजून बिघडत चालली आहे. आपण जवळपास ५०० कोटी खर्च केले आहेत. आपण सध्या अशा परिस्थितीत आहोत जिथे राज्यांची तिजोरी रिकामी आहे. केंद्र सरकारने जीएसटी नुकसान भरपाईदेखील दिलेली नाही. आपण एकत्रितपणे पंतप्रधानांना सामोरं गेलं पाहिजे या ममता बॅनर्जींच्या मताशी मी सहमत आहे”.

आणखी वाचा- “मोदी सरकारविरोधात एकत्र या,” सोनिया गांधींचं मुख्यमंत्री बैठकीत आवाहन; उद्धव ठाकरेही सहभागी

“११ ऑगस्ट रोजी झालेल्या अर्थ स्थायी समितीच्या बैठकीत केंद्र सरकारने यावर्षी आपल्याला १४ टक्के जीएसटी नुकसान भरपाई देणं शक्य नसल्याचं सांगितलं. हा नकार म्हणजे मोदी सरकारने दिलेला विश्वासघात आहेत,” अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.

सर्व राज्यांनी एकत्र आलं पाहिजे अशी विनंती यावेळी ममता बॅनर्जी यांनी केली. “माझी विनंती आहे की, सर्वांनी एकत्र येऊन सुप्रीम कोर्टात जाऊया आणि जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत जेईई आणि आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करावी,” असं ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितलं.