“महाराष्ट्र करोनाविरोधतली लढाई लढतो आहे, खंबीरपणे ही लढाई महाराष्ट्र लढतो आहे. महाराष्ट्राच्या पराक्रमाच्या गाथा या कित्येक वर्षांच्या आहेत. कोणत्याही क्षेत्रात महाराष्ट्र कमी नाही. अंधश्रद्धा निर्मूलन, क्रांतिकारी विचार हे सगळं रुजवणारा आणि जपणारा हा महाराष्ट्र आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मी करोनाविरोधातल्या लढाईत जिंकणार हे मला माहित आहे कारण महाराष्ट्र माझ्या साथीला आहे. आपण करोना व्हायरसची श्रृंखला तोडण्यात आपण यशस्वी झालो आहोत” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. “लॉकडाउनपेक्षा मी थोडा वेगळा शब्द वापरेन जो सिंगापूरच्या पंतप्रधानांनीही वापरला होता सर्किट ब्रेकर्स..अर्थात हे गतिरोधक आहेत. व्हायरसची श्रृंखला तोडण्यासाठी हे गतिरोधक आवश्यक आहेत” असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

“३ मे नंतर आत्ता जी बंधनं आहेत त्यात आपण बरीच मोकळीक देणार आहोत. मात्र झुंबड उडाली, सावधगिरी बाळगली गेली नाही तर मात्र ही बंधनं पुन्हा घालावी लागतील. करोनाविरोधातले हे युद्ध आपण जिंकणार आहोत, तुम्ही सगळ्यांनी जी साथ दिली ती अशीच असूद्या” असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर यांसह रेड झोन असलेल्या जिल्ह्यांना तूर्तास दिलासा देण्यात आले नाही.

आणखी वाचा- उद्धव ठाकरे म्हणतात, “आजपर्यंत हुतात्मा चौकात अनेकदा गेलो आहे, मात्र आज…”

संयुक्त महाराष्ट्राला ५० वर्षे झाली त्याची आठवण

“महाराष्ट्र दिनाला आज ६० वर्षे पूर्ण झाली. आजचा हिरक महोत्सव राज्यभरात साजरा करायचा असं आपण ठरवलं होतं. पण नाईलाज आहे. आज मी अभिवादन करायला गेलो तेव्हा मास्क लावला होता. संयुक्त महाराष्ट्राला ५० वर्षे पूर्ण झाली होती त्यावेळी कसा सोहळा झाला ते सगळ्यांना आठवत असेल. १ मे २०१० रोजी लाखो लोक जमले होते. शिवसेना प्रमुख, बाबासाहेब पुरंदरे होते आणि लतादीदी होत्या. बहु असोत सुंदर हे १९६० मध्ये गाणं लतादीदींनी गायलं होतं तेच गाणं पुन्हा २०१० पुन्हा गायलं होतं. आज त्याच ग्राऊंडमध्ये आपण करोनाग्रस्तांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उभं करतो आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.