मेधा पाटकर

महानोरदादा गेले! अगदी अलीकडेच २ जुलैला त्यांची भेट झाली होती ती जळगावच्या हास्पिटलमध्ये… तेव्हाही त्यांच्या आजारापलीकडे जाणवली होती ती त्यांच्यातली ऊर्जा- शब्दाशब्दांतली आणि भावभावनांसह जोडलेल्या विचारांची! पर्यावरण ते राजकारण… हा होता त्यांचा व्यापक नजरिया! आज अचानक त्यांच्या निधनाची बातमी मिळाली तेव्हा जुन्या आठवणी वर उसळून आल्या- त्या दादांच्या नर्मदेशीच नव्हे, तर भवतालातील निसर्गाशी व ते वाचवण्यासाठीच चाललेल्या ३८ वर्षांच्या जनआंदोलनाशी असलेल्या नातेबंधाच्या!!

Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde Astrology
शिंदे, पवार, फडणवीसांना ‘या’ अंकाचा धागा ठेवतो जोडून; २०२४ मध्ये मात्र येईल ‘हा’ अडथळा, ज्योतिषी काय सांगतात?
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!

‘रानकवी’ म्हणून सर्वश्रुत असलेले महानोरदादा हे जल, जंगल, जमिनीशी जोडलेल्या प्रदीर्घ प्रवासातच कविता रचत होते. त्यांच्या कवितेतून ते ज्वारीच्या कणसालाही फुलवून दाखवत, तेव्हा आपल्याही निसर्गाविषयीच्या भावना उमलून येत असत! पण त्यांच्या पळासखेडे गावात रामदास भटकळजी, विजयाताई चौहान आम्ही सारे पोहोचलो तेव्हा त्यांचा निसर्ग परिवार आम्हाला भेटला. सीताफळांनी लगडलेली बाग- बगीचा आणि त्यांचे मातीत बरेच काही रुजवणारे हात! त्यांच्या पत्नी- सुलोचना वहिनी व मुलेबाळे सर्वांना धरातलावर उतरवत ते जगत होते, हेच खरे!

एकीकडे जैन इरिगेशनच्या भवरलालजींचे तर दुसरीकडे शरद पवारजींचे ते जवळचे स्नेही! जैन संस्थेतील सर्व कार्याशी घनिष्ठ संबंध ठेवून, त्यांनी आम्हालाही भवरलालजींचे ‘मोठी नकोत, लहान धरणेच हवीत’ हा विचार ऐकवून त्यांच्यासह सुंदर वार्तालापात ओढले. महानोरदादांचे निसर्ग मानवातील नात्याविषयीचे लेखन, काव्य व आज तेच संपवत चाललेल्या विकासाविषयीचे परखड भाष्य, वैविध्य, जैविकता याबरोबरच शेती – शेतकऱ्यास न मिळणारा स्थान – सन्मान, या साऱ्यांबाबत होते… म्हणूनच तर ते नामदार झाले, जनप्रतिनिधी राहिले! कधी शेतकरी दिंडीत पुढाकार घेते झाले व नर्मदा – सरदार सरोवर संबंधी सरकारने नेमलेल्या समितीचे सदस्यही राहिले, पण आम्हाला जोडून ठेवून ते पारदर्शी, जवाबदेही राहिल्याने सारे कागद चर्चा खुली करत!

दादांसह अजिंठा लेणी पाहायला गेलो तेव्हा त्यांचा लेण्यांचा इतिहासच नव्हे तर पहाडाखालच्या गावातील माणसे व पिढ्यांची प्रतीके यांचा अभ्यास व बाजारी आक्रमणापासून हे पुरातत्व वाचवण्याचा ध्यास आम्ही अनुभवला. पारोच्या समाधीजवळ बसून त्यांनी भावविश्वच उलगडून दाखवले. तिथला फोटो कसा कोण जाणे, आज दादा गेल्यावर माझ्यापर्यंत पोहोचला!

शेतकरी, कष्टकरी समुदायाविषयी महानोरदादांची आर्त दृष्टी ते जेव्हा ते नामदार झाले, तेव्हा विधानसभेत उठवलेल्या अनेकानेक प्रश्नांमधून दिसली. परंतु ते एक असे प्रतिनिधी होते की जे मंचावर बसून न राहता गावोगावी फिरायचे… झोपड्या, घरांतून, शेतातून सामान्यांचे जगणे समजून भूमीसुधार सारख्या मुद्द्यांनाही भिडायचे. आजचे राजकारण हे एकमेकांवर शेण फेकणारे झाल्याने दादा खंत व्यक्त करायचे. पळसखेड्यातील शेती, सुलोचना वहिनींमुळे त्यांचा आधार राहिली, तिथेच शतेकऱ्यांच्या समस्यांची पाळेमुळे उखडत गेली…

दादांना राजकारणात खूप बरे-वाईट कडवट अनुभवही आले ‘कविता बंद करा’ अशा धमक्याही येत… त्यांनी हे सारे सहन केले ते बहुधा मनभरच्या नैसर्गिकतेच्याच बळावर! कुटुंबातील उतारचढावही ते सोसत राहिले. ते किती पुरस्कारांचे धनी झाले. कुसुमाग्रज, कवी ग्रेस, बा. भ. बोरकर, पुलं- भाई, भालचंद्र नेमाडे ते लता मंगेशकर अन् आशाताई भोसले या सर्वांचे प्रेम हे सत्कारापेक्षा मोलाचे मानून त्यांनी लेखनात टिपले…
एका शेतमजुराच्या घरी जन्मलेला हा रानकवी, परिवर्तनजीवी कवी आज गेला. त्यांना जळगावमध्ये भेटलो तेव्हाही तो ‘रानकवी’ त्यांच्या बोलघेवड्या संवादातून प्रकटत राहिला. आमचे श्रमिक नवीन मिश्राजींच्या सुरात त्यांना नदीचे गाणे ऐकवले तेही उभ्या उभ्या… ‘पर्बत की चिठ्ठी ले जाना, तू सागर की ओऽर… नदी तू बहती रहना; रेवा तू बहती रहना…!’ तेव्हा तेही भारावून गेले!

आज अचानक ते निवर्तले तरी सारे शब्दसंभार व निसर्गप्रेमी कष्टभावी, साने गुरुजी ते गांधीजींची त्यांना पटलेली व त्यांनी स्वत: जगलेली जीवनप्रणाली मागे साेडून… आम्हा सर्वांसाठी संदेश म्हणून मागे ठेवून!

medha.narmada@gmail.com