राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी गेल्यावर्षी २ जुलै रोजी शरद पवारांविरोधात बंड केले होते. राष्ट्रवादी पक्षात फूट पाडून त्यांनी विरोधी बाकावरून थेट सत्तेत प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट निर्माण झाले. हे प्रकरण पुढे सर्वोच्च न्यायालयातही गेलं. पण महत्त्वाचे म्हणजे तेव्हापासून आजपर्यत अजित पवार परत आले तर काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरच आता शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – मुस्लिमांचं काय घेऊन बसलात? मला ५ मुलं आहेत! मल्लिकार्जुन खरगेंचं मोदींना प्रत्युत्तर

सुप्रिया सुळे यांनी नुकताच टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांना अजित पवार शरद पवारांकडे परत आले तर काय? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नांचे उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी मी जर तरच्या गोष्टींचा विचार करत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

“अजित पवार परत आले तर काय? या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. मी जर तरच्या गोष्टींचा विचार करत नाही. मी वास्तवतेत जगणारी व्यक्ती आहे. अजित पवारांनी आता वेगळी वैचारिक भूमिका घेतली आहे. त्यामुळे एखाद्याने एखादी वैचारिक भूमिका घेतली असेल, त्यांना आपण शुभेच्छा दिल्या पाहिजे”, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

हेही वाचा – उद्धव ठाकरे यांचा भाजपाला जाहीर इशारा; म्हणाले, “याद राखा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वी हाच प्रश्न शरद पवार यांनाही विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली होती. “भविष्यात अशी परिस्थिती उद्भवली, तर आधीच्या अनुभवावरून आलेला शहाणपणा स्वीकारायचा असतो”, अशा सूचक शब्दांत त्यांनी उत्तर दिले होते.