सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासातून बालकाचे अपहरण करून खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी येथे उघडकीस आली. आर्यन शिरीष सासणे असे खून करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे, पावणेदोन वर्षांचा आर्यन हा नाना पाटील नगरातील घरी खेळत असताना त्याची आई घरकामात व्यस्त होती. त्यावेळी कुणीतरी त्याला पळवून नेले. तो हरवल्याची तक्रार करवीर पोलीस ठाण्यात वडिलांनी दिली. त्यानंतर सायंकाळी पुइवाडी येथे निर्जन भागात एका बालकाचे प्रेत असल्याचे गुराख्यांना दिसून आले, त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर वर्णनावरून तो मृतदेह आर्यन याचाच असल्याचे पोलिसांनी सांगितले. आर्यनच्या गळ्यातील सोन साखळी व कानातील सोन्याचे दागिने काढून घेण्यात आले होते. त्याचे वडील शिरीष सासणे यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे.