दिगंबर शिंदे, लोकसत्ता सांगली : जयंत पाटील, अनिल बाबर, अरुण लाड या सांगली जिल्ह्यातील नेतेमंडळींनी राजकीय वारस म्हणून आपल्या मुलांना पुढे आणण्यास सुरुवात केली आहे. या यादीत आता शिराळय़ाचे राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मुलाची भर पडली आहे. नुकत्याच झालेल्या विश्वास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळात विराज नाईक यांना संधी देऊन आपला राजकीय वारसदार कोण असेल हे स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी त्यांच्याकडे विराज उद्योग समूहाचे अध्यक्षपदही सोपविण्यात आले होते तर राष्ट्रवादीच्या युवा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारीही पक्षाने सोपवली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील हेही राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले आहेत. त्यांचे अधिक लक्ष जत तालुक्यावर आणि त्या खालोखाल कवठेमहांकाळ तालुक्यावर असते. जतचा डफळे साखर कारखाना राजारामबापू कारखान्याचे युनिट चार म्हणून चालविला जात आहे. याचबरोबर कुंडलचे आमदार अरुणअण्णा लाड यांचे पुत्र शरद लाड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत, तर विटय़ाचे आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांनी अडीच वर्षे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुत्र वैभव पाटील यांनी नगराध्यक्ष म्हणून वेगळा ठसा जसा उमटवला तसाच स्वच्छ सव्र्हेक्षणामध्ये विटा शहराला देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळविण्यातही मोलाचे योगदान दिले. जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांचे पुत्र मनोज जगताप जत पंचायत समितीचे सभापती म्हणून कार्यरत आहेत. मात्र, सामान्य कार्यकर्त्यांच्या मागील पिढीने सतरंज्या उचलल्या, आता या पिढीने खुर्च्या उचलायच्या एवढीच काय ती प्रगती. आमदार नाईक यांचे पुत्र विराज नाईक यांनी गेल्या दोन-तीन वर्षांत राजकीय जीवनात प्रवेश केला आहे. राजकीय जीवनात प्रवेश करताच त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा युवक आघाडीचे अध्यक्षपद चालून आले. पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष पद हाती असताना आता विश्वास साखर कारखान्याचे संचालकपदही मिळाले आहे. कारखान्याचे अध्यक्षपद सध्या आ. नाईक यांच्याकडे असले तरी विराज उद्योग समूहाची धुरा गेली दोन वर्षे विराजच्या खांद्यावर आहे. विश्वास साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक अविरोध होण्याची ही पाचवी टर्म आहे. यामुळे कारखान्याचा कारभार गेल्या वीस वर्षांपासून एकहाती राहिला तो नेतृत्वावरील विश्वासामुळे. या संचालक मंडळातही बुजुर्ग मंडळींचे संख्याबळ जास्त असून विराज हे एकमेव तरुण संचालक आहेत. युवक जिल्हाध्यक्षपद हे मिरवण्यासाठी नसून ते कार्यकत्र्यांना संघटित करून राष्ट्रवादीचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आहे असे मी मानतो. कारखाना संचालकपद हे प्रस्थापित पिढी आणि उमलती तरुणाई यांच्यात समन्वय साधून शेतीची उत्पादकता कशी वाढेल यासाठी प्रयत्न करण्याची संधी म्हणून या पदाचा उपयोग करण्याचा मानस असून विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी कशा निर्माण करता येतील याकडे अधिक लक्ष दिले जाईल. - विराज नाईक. कार्यकर्त्यांचे काय? सामान्य कार्यकर्त्यांच्या मागील पिढीने सतरंज्या उचलल्या, आता या पिढीने खुर्च्या उचलायच्या एवढीच काय ती प्रगती. हीच स्थिती आहे.