काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या 'भारत जोडो यात्रे'चा महाराष्ट्रातील प्रवास संपला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी प्रचारासाठी गेले आहेत. त्यामुळे दोन दिवस यात्रेला विश्रांती देण्यात आली आहे. त्यानंतर ही यात्रा मध्यप्रदेशमधून सुरु होणार आहे. त्यात आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी 'भारत जोडो यात्रे'वर आरोप करत राहुल गांधींवर टीका केली आहे. तामिळनाडूतून सुरु झालेल्या 'भारत जोडो यात्रे'त अनेक कलाकरांनी हजेरी लावली. मात्र, यात्रेत सहभागी होण्यासाठी पैसे देऊन आणले जात असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे. "भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने नौंटकी सुरु आहे. राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'त दिसणारे कलाकार पैसे देऊन आणले आहे. यासाठी भारत जोडो यात्रेच्या टीमकडून एक मॅसेज पाठवल्याचं समोर आलं आहे. यात्रेत १५ मिनिटे चालून राहुल गांधींना पाठिंबा देणारे कलाकार पैसे देऊन आणण्यात आले का?," असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. हेही वाचा : वंचित बहुजन आघाडी-ठाकरे गट युतीबाबत संजय राऊतांचे सुचक विधान; म्हणाले, “राज्यात परिवर्तन…” तसेच, नितेश राणेंनी एक ट्विटही केलं आहे. त्यात व्हॉट्सअप मेसेजचा स्क्रीनशॉट त्यांनी शेअर केला आहे. यामध्ये नाव अथवा नंबर दिसत नाही. त्यावर नितेश राणेंनी लिहलं की, "भारत जोडो यात्रेत राहुल गांधींबरोबर चालण्यासाठी कलाकारांना किती पैसे दिले जातात, याचा हा पुरावा. सब गोलमाल है भाई… हा पप्पू कधी पास नाही होणार," असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे.