पालघर जिल्ह्यातील मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या ५१२ नौका समुद्रकिनारी सुखरूप पोहचल्या आहेत. तौते चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मच्छीमारांसाठी तसेच समुद्रकिनारी रहिवासी असलेल्या नागरीकांसाठी अलर्ट जारी केला होता. मच्छीमार आणि नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून पालघर जिल्ह्यातील सर्व नौका समुद्रकिनारी परत आल्या आहेत.

सध्या अरबी समुद्रात घोंगावत असलेले चक्रीवादळ हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून हे वादळ पुढे गुजरातच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीतील यंत्रणांना सर्तक झाल्या आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणात सतर्कतेचे आदेश

दुसरीकडे वादळाची चाहूल लागली असून, कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस झाल्यानं घरांसह शेतमालाचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याचा वेग वाढला आहे.

‘तौते’ वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील ५ तालुक्यांमध्ये संचारबंदी!

या वादळामुळे निर्माण होणाऱ्या वाऱ्यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली आणि मंडणगड या ५ तालुक्यांच्या किनारी भागात फटका बसण्याची शक्यता गृहित धरून या पाचही. तालुक्यांमध्ये रविवारी पहाटेपासून संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे.