पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शिर्डी दौऱ्यावर असून त्यांनी निळवंडे धरणाचं जलपूजन केलं आहे. यानंतर त्यांनी शिर्डी येथील ‘शेतकरी महासन्मान मेळावा’ कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना संबोधित केलं आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांसमोरच शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली.

शेतकऱ्यांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले, “आम्ही खरी नियत ठेवून शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी काम करत आहोत. पण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण केलं आहे. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेते (शरद पवार) केंद्र सरकारमध्ये अनेक वर्षे कृषीमंत्री होते. व्यक्तिगत पातळीवर मी त्यांचा सन्मान करतो. पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? त्यांनी आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात देशातील शेतकऱ्यांकडून केवळ साडेतीन लाख कोटींचा शेतीमाल एमएसपीवर खरेदी केला. पण आमच्या सरकारने सात वर्षांत साडे तेरा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले.”

हेही वाचा- “मराठा समाजाची मागणी चुकीची…”; भाजपाच्या बड्या नेत्याचं विधान चर्चेत, सदावर्तेंनाही दिला सल्ला

“२०१४ च्या आधी तेलबियांची आणि कडधान्यांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून ५०० ते ६०० कोटींची उत्पादने एमएसपीवर खरेदी केली जात होती. पण आमच्या सरकारने तेलबिया आणि कडधान्यांचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १ लाख १५ हजार कोटी रुपये पाठवले आहेत. ते (शरद पवार) जेव्हा कृषीमंत्री होते, तेव्हा शेतकऱ्यांना स्वत:च्या पैशांसाठीही दलालांच्या भरवशावर राहावं लागत होतं. अनेक महिने शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते. आमच्या सरकारने एमएसपीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली,” असंही नरेंद्र मोदींनी नमूद केलं.

हेही वाचा- “बाबा महाराज सातारकर यांचं कार्य प्रेरणादायी कारण…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘या’ शब्दांत वाहिली आदरांजली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “अलीकडेच आमच्या सरकारने रबी पिकांसाठी एमएसपीची घोषणा केली आहे. चणा पिकासाठी १०५ रुपये तर गहू आणि कुसूम पिकांसाठी एमएसपीमध्ये १५० रुपयांची वाढ केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा खूप लाभ होईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचीही आम्ही चांगल्याप्रकारे काळजी घेत आहोत. सरकारने गेल्या ९ वर्षांत ७० हजार कोटी रुपयांचं इथेनॉल खरेदी केलं आहे. हा सर्व पैसाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे.”