विठ्ठल आमुचा निजांचा। सज्जन सोयरा जीवांचा।
मायबाप चुलता बंधु। अवघा तुजशी संबंधु।
उभयकुळी साक्ष। तू चि माझा मातुळ पक्ष।
समर्पिली काया। तुका म्हणे पंढरीराया।
अकलूजकरांचा भावपूर्ण निरोप घेऊन जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने सोमवारी सकाळी वारीच्या वाटेवरील बोरगाव गावाकडे प्रस्थान ठेवले. पंढरी आता समीप आल्याने वैष्णवांची पाऊले विठुरायाच्या भेटीच्या ओढीने झपाझपट पडत होती. सकाळपासूनच ढगाळ वातावरण, अधूनमधून वाऱ्याची मंद लहर, आसमंतात फडकणाऱ्या पताका, अखंड हरिनामाचा गजर अन ज्ञानोबा-माऊली तुकारामाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात पहिल्या विश्रांतीसाठी व उभ्या रिंगण सोहळ्यासाठी पालखी सोहळा माळीनगरमध्ये दाखल झाला. पारंपरिक रीतीरिवाजाने माळीनगरकारांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले आणि उभ्या रिंगण सोहळ्याची तयारी सुरू झाली. दुतर्फा उभे राहिलेल्या हजारो वैष्णव आणि भाविकांमधून भागवत धर्माच्या पताकांनी वैष्णवांच्या खांद्यावर विराजमान होऊन एक लयबद्ध सळसळ करून वेग घेतला आणि पताकाधारी वैष्णवांचे रिंगण पूर्ण झाले. वृंदावन घेतलेल्या टाळकरी आणि वीणेकऱ्यांनीही तीच गती पकडून आपले रिंगण पूर्ण केले. देवाच्या व मोहिते पाटलांच्या घोडय़ांनी क्षणाचीही उसंत न खाता वायुवेगाने रिंगण पूर्ण करताच पुन्हा विठुनामाचा गजर अत्युच्च उंचीवर पोहचला. भक्तिमय रसात चिंब करणारे हे उभे रिंगण पाहण्यासाठी व पादुकांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी माळीनगरमध्ये गर्दी केली होती.
रिंगणसोहळ्यानंतर पालखी सोहळा माळीनगरमध्ये दुपारच्या विश्रांतीसाठी विसावला. माळीनगरकरांचा निरोप घेऊन पायरीपूल, कदमवस्ती असा पल्ला पार करून श्रीपूर कारखाना येथे पालखी सोहळ्याने चौथी विश्रांती घेतली. या वेळी श्रीपूर कारखाना व श्रीपूरकरांच्यावतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.