हिंगोली: वसमत तालुक्यातील गोरक्षणनाथ ‘वाई’ येथे उद्या (शनिवारी) १११ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असून त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच अन्य एका कार्यक्रमात पूर्णा साखर कारखान्याच्या कारकीर्दीवर आशुतोष देशमुख यांनी लिहिलेल्या ‘पूर्णा साखर कारखाना सिंहावलोकन- सुवर्ण महोत्सवी वाटचाल’ या पुस्तिकेचे प्रकाशनही पवार यांच्या हस्ते होणार आहे. पूर्णा सहकारी साखर कारखान्यावर दुपारी दोनच्या सुमारास होणाऱ्या या प्रकाशन सोहळय़ास कारखान्याचे अध्यक्ष तथा माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी आमदार पंडितराव देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत. राजूभय्या नवघरे सेवा प्रतिष्ठानतर्फे दुपारी सामुदायिक विवाह सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. सामुदायिक विवाह सोहळय़ाचे यंदा तिसरे वर्ष असून आमदार राजू नवघरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येतो. प्रतिष्ठानतर्फे नवविवाहित दांपत्यांना संसारोपयोगी साहित्यही दिले जाते.