केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी यावर प्रतिक्रिया देत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. "निवडणूक आयोगाचा हा निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अपेक्षित होता. शिवसेनेच्या या परिस्थितीला शरद पवारच जबाबदार आहेत", असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. हेही वाचा- त्रिशूळ, उगवता सूर्य, मशाल…उद्धवसेनेकडून चिन्हांची चाचपणी सुरू शिवतारे म्हणाले, दोनच दिवसांपूर्वी त्यांनी ‘जो निर्णय येईल, त्याचं स्वागत केलं पाहिजे,’ असं एक वक्तव्य केले होते. त्यामुळे हे मोठे लोक कुठे काही गेम करतील, सांगता येत नाही. शिवसेना संपवायला शरद पवारच जबाबदार आहेत. सगळा दोष पवारांचा आहे, यातून त्यांना स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. विधानसभेची २०१४ ची निवडणूक झाल्यानंतर पवार यांनी भाजपला बिनशर्त पाठींबा दिला होता. तो पाठिंबा म्हणजे पवारांचा एक कट होता. शिवसेना-भाजपचा संसार पवार यांना चालू द्यायचा नव्हता. पवार यांनी कधीच शिवसेनेशी जुळवून घेतलं नाही. पवार यांची मैत्री हिंदूह्रदयसम्राट यांच्याशी असली तरी राजकीय मतभेद होतेच. उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये खुर्चीच्या मोहापायी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना संपवत पवार यांच्याकडे जाऊन बसले. शरद पवार राज्याच्या राजकारणातील बरमूडा ट्रँगल आहेत. त्यांच्याजवळ गेलेले सगळे संपले आहेत, हा इतिहास आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २०१९ मध्ये एकही उमेदवार नसताना राज ठाकरे यांना पुढे करत ‘लाव रे तो व्हीडीओ’ म्हणायला लावले. गरज संपली की त्यांना झटकून टाकले, असेही शिवतारे यांनी नमूद केले. हेही वाचा- उद्धव ठाकरेंना दिलासा! “शिवसेना नाव वापरता येणार पण…,” ‘या’ नेत्याने स्पष्टचं सांगितलं विजय शिवतारे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या भोळेपणाचा फायदा शरद पवार आणि अजित पवार यांनी घेतला आहे. शरद पवार यांचा डाव शनिवारी अखेर यशस्वी झाला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे या कटकारस्थानाला जबाबदार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय दुर्दैवी आहे. हेही वाचा- “शिवसेना आमची आहे सांगणाऱ्यांनी आईला…”, किशोरी पेडणेकरांचा शिंदे गटावर हल्लाबोल; एकनाथ शिंदेंवरही टीकास्र! बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की, काँग्रेसची पंचसूत्री गाडा आणि माझ्यानंतर उद्धवला सांभाळा. याची आठवण कोणाला आता होत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असलेली युती तोडा, हे सांगायला १६ आमदार गेल्यानंतर तुम्हाला जायचं असेल, तर तुम्हीपण जा, असे उद्धव ठाकरे आमदारांना म्हणाले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने काय भानामती केली, कुणास ठाऊक, असा सवालही शिवतारे यांनी या वेळी उपस्थित केला.