शिवसेना खासदार संजय राऊत मागील जवळपास १०० दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत होते. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली होती. आज अखेर त्यांना जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर बुधवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास संजय राऊतांची ऑर्थर रोड कारागृहातून सुटका झाली आहे. यानंतर ते आपल्या भांडुप येथील घरी पोहोचले आहेत. याठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं आहे. घरी पोहोचल्यानंतर केलेल्या भाषणात संजय राऊतांनी मोठं विधान केलं आहे. संजय राऊतांना अटक करून त्यांनी खूप मोठी चूक केली आहे. ही देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चूक असेल, असं विधान संजय राऊतांनी केलं आहे. हेही वाचा- “लगता हैं कल से फिर…” संजय राऊतांची सुटका होताच मोहित कंबोज यांचं ट्वीट व्हायरल "मी मरण पत्करेन पण शरण जाणार नाही. गेल्या तीन महिन्यात शिवसेना फोडण्याचा आणि तोडण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण ही शिवसेना तुटली नाही. ही शिवसेना अभेद्य शिवसेना आहे, ही बुलंद शिवसेना आहे, हे अंधेरीच्या पोटनिवडणुकीतील विजयानं दाखवून दिलं आहे. आता मशाल भडकली आहे. आता महाराष्ट्रात केवळ एकच शिवसेना राहील ती शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची असेल" असंही राऊत यावेळी म्हणाले. हेही वाचा- “संजय राऊतांना जामीन मिळाला, पण…” सुधीर मुनगंटीवारांचं मोठं विधान! संजय राऊत पुढे म्हणाले, "आता त्यांना कळेल की, मला अटक करून त्यांनी किती मोठी चूक केली आहे. देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चूक कोणती असेल? तर ती चूक संजय राऊतांना अटक करणं असेल. आज न्यायालयाने सांगितलं की, संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आहे. संजय राऊतांचा कोणताही गुन्हा नाही. हे न्यायालयाने सांगितल्यावर मला अटक करणारे उच्च न्यायालयात पळत-पळत गेले. त्यांना जाऊ द्या. मला कितीही वेळा अटक करा. पण मी शिवसेनेला त्यागणार नाही. हा भगवा सोडणार नाही. हा भगवा घेऊन मी जन्माला आलोय."