बेळगाव महापालिकेची निवडणूक आज पार पडत असून पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकवण्यासाठी मराठी भाषकांनी कंबर कसली आहे. भाजपा, काँग्रेस, जनता दल, एमआयएम या पक्षांनी प्रथमच रिंगणात उडी घेतल्याने संघर्ष जोरदार होणार आहे. दरम्यान पालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फडकेल असा विश्वास शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कर्नाटक सरकारचा त्रास सहन करावा लागू नये यासाठी येथूनच मदत करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

“बेळगाव पालिकेची निवडणूक आठ वर्षांनी होत आहे. बहुमताने मराठी सत्ता असणारी पालिका द्वेषबुद्दीने बर्खास्त केली, भगवा झेंडा काढण्यात आला. लोकशाहीची हत्या करणारी अशी अनेक कृत्य कर्नाटक सरकारने केली आहेत. लोकसभा निवडणुकीत उमेदवार शुभम शेळके यांना लाखोंची मतं पडली. एकजूट चांगली होत आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर मराठी संघटना मिळून ३० च्या आसपास जागा जिंकू आणि पुन्हा एकदा बेळगाव महापालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फडकेल असं उत्साही वातावरण बेळगावात दिसेल,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी एकजुटीने मतदान करा असं आवाहन बेळगावमधील मराठी नागरिकांना केलं. बेळगाव आपलंच आहे हे दाखवण्याची संधी मिळाली असल्याचंही ते म्हणाले आहेत.

५८ सदस्यीय बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत ३८५ उमेदवार रिंगणात आहेत, तर सुमारे सव्वाचार लाख मतदार आहेत. अलीकडेच झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांना सुमारे सव्वा लाख मते मिळाली. यावरून एकीकरण समितीचे अद्यापही प्राबल्य असल्याचे स्पष्ट झाले. महापालिका निवडणुकीत एकीकरण समितीपुढे आव्हान असेल.

सीमालढ्याचे बेळगाव हे प्रमुख केंद्र राहिले. बेळगाव महापालिकेत सुरुवातीपासूनच मराठी भाषक नगरसेवकांचे वर्चस्व राहिले. १९७६ साली बेळगाव महापालिकेची स्थापना झाली. पुढे आठ वर्षे प्रशासक कारकीर्द होती. १९८४ साली पहिली निवडणूक झाली. तेव्हापासून ते आताच्या विद्यमान बाराव्या सभागृहात एकीकरण समितीचे बहुतेक महापौर झाले. लोकसभा निवडणुकीला एकीकरण समितीचे शुभम शेळके यांनी सव्वा लाख मते घेतल्याने मराठी भाषकांची ताकद दिसून आली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागात उमेदवारीसाठी चढाओढ दिसून आली. त्यावर एकीकरण समितीने प्रभागातील पंचांना उमेदवारीचे अधिकार दिले. त्यातून २३ अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. अन्य प्रभागांमध्ये मराठी भाषक उमेदवारांना निवडणूक लढवण्याची मुभा दिली आहे. त्यांनी निवडून आल्यानंतर समितीच्या झेंड्याखाली काम करायचे ठरवले आहे.

राजकीय खेळी

आजवर केवळ सहा वेळा कन्नड भाषक महापौर झाले. या वेळच्या निवडणुकीपूर्वी मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली. तेव्हा मराठी भाषक बहुसंख्य असलेले प्रभाग जाणीवपूर्वक फोडले गेले. कन्नड व उर्दू भाषकांचा फायदा पाहणारे प्रभाग जोडले गेले. शिवाय बेळगाव महापालिका कार्यक्षेत्रात दक्षिण व उत्तर हे दोन विधानसभा मतदारसंघ हद्दीत येतात. परंतु, बेळगाव ग्रामीण व व यमकनमर्डी येथील काही भाग बेळगावशी जोडला असल्याचे दाखवून तेथील लोकप्रतिनिधींनाही मतदानाचा अधिकार अबाधित ठेवून मराठी भाषकांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला आहे.