सोलापूर : सोलापूरसाठी शासनाने मंजूर केलेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र अचानकपणे बारामतीला वळविण्याच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुती सरकारच्या विरोधात सोलापूरकरांमध्ये वाढलेल्या नाराजीचा फटका आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसू नये म्हणून अखेर हे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलविण्याचा निर्णय रद्द करून हे केंद्र सोलापुरातच उभारण्याचा दुरुस्त निर्णय शासनाने जारी केला आहे. भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी शासनाचे आभार मानले आहेत. मागील २०२३ वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरा होत असताना त्याचे औचित्य साधून शासनाने सोलापुरात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र उभारण्याचा निर्णय १७ एप्रिल २०२३ रोजी घेतला होता. रब्बी पीक हंगामासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात ज्वारीसह इतर तृणधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्याचाच विचार करून श्री अन्न उत्कृष्टता केंद्र उभारण्याचे शासनाने जाहीर केले होते. परंतु त्यानंतर हे केंद्र उभारण्याच्यादृष्टीने कोणत्याही हालचाली दिसत नसतानाच गेल्या २४ नोव्हेंबर शासनाने एका परिपत्रकाद्वारे सोलापूरचे हे केंद्र बारामतीकडे वळविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सोलापुरात तीव्र नाराजीचे पडसाद उमटले असता त्यात भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरात न उभारल्यास आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात येऊन हे केंद्र सोलापुरातच कायम राहणार असून बारामतीमध्ये केवळ शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच सोलापुरातही प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जिल्हा विकास समितीमधून सहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्याचे जाहीर केले होते. मात्र त्या अनुषंगाने कोणत्याचा हालचाली झाल्या नाहीत. हेही वाचा - “मी कोरे पाकीट, जो पत्ता टाकला जाईल तिकडे पोहोचेल”, चंद्रकांत पाटलांकडून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेत हेही वाचा - अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांचा आज शरद पवार गटात प्रवेश होणार! सोलापुरात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र आणि बारामतीमध्ये शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्याबाबत शासनाच्या आदेशपत्रात दोनच दिवसांत आवश्यक दुरुस्ती करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या ५ फेब्रुवारी रोजी जाहीर केले होते. परंतु त्यादृष्टीने कार्यवाही होत नव्हती. त्यामुळे इकडे सोलापूरकरांची नाराजी वाढतच होती. या नाराजीचा फटका आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसण्याची चिन्हे दिसत असताना अखेर काल १३ मार्च रोजी शासनाने आदेशात दुरुस्ती करून श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच उभारण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.