हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा सिंचन घोटाळ्यात सपशेल बुडाल्यानंतर दुसऱ्या आठवडय़ात विदर्भातील लोकप्रतिनिधींना सूर सापडला. विधानसभेत नियम २९३ अन्वये बुधवरी सत्ताधारी आणि विरोधकांनी मांडलेल्या विदर्भावरील चर्चेच्या ठरावानंतर रात्री उशिरापर्यंत घणाघाती चर्चा रंगली. विकासाच्या मुद्दय़ावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पहिल्यांदाच अभूतपूर्व एकजूट दाखविल्याने विदर्भाचा आवाज बुलंद झाला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत एकूण ३२ आमदारांनी चर्चेत मते मांडली. मात्र, यादरम्यान अन्य भागांचे लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना चर्चेत भाग घेण्यासाठी फुरसत नव्हती. त्यांच्या मोठय़ा प्रमाणावरील अनुपस्थितीने नाराजीचा सूर उमटत राहिला.
महाराष्ट्रात सामील होऊन विदर्भाला काय मिळाले, त्यापेक्षा स्वतंत्र विदर्भ दिला असता तर आज भीक मागण्याची वेळ आली नसती, अशा कठोर शब्दात आमदारांनी भावना व्यक्त केल्या. काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी चर्चेला सुरुवात करताना सिंचनाची आकडेवारी आणि महामंडळातील रिक्त पदे भरण्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. विदर्भात सर्वाधिक वीज निर्मिती होत असताना सर्वाधिक भारनियमनाला विदर्भ तोंड देत आहे. सिंचनाचे पाणी औष्णि वीज प्रकल्पांकडे वळविले जात आहे, याकडे जगताप यांनी लक्ष वेधले.
भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या औद्योगिक धोरणात विदर्भात काहीही विशेष सवलती देण्यात आलेल्या नाहीत, याचा उल्लेख करतानाच विदर्भातील उद्योगांना स्वस्त दराने वीज पुरविल्यास नवीन उद्योगांची गुंतवणूक वाढेल, अशी आशा व्यक्त केली. विदर्भाच्या आर्थिक अनुशेषाकडे लक्ष वेधतानाच बेरोजगारीचे संकट, औष्णिक वीज प्रकल्पांमुळे उद्भवणारे आरोग्याचे प्रश्न याचाही ऊहापोह केला. महाराष्ट्रात राहून विदर्भाला न्याय मिळालेला नाही, त्यामुळे वेगळ्या राज्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांनी तासभराच्या घणाघाती मांडणीत मंत्रालय देताना विदर्भावर झालेला अन्याय, निवडक पाच जिल्ह्य़ांनाच निधीचा अधिकार असलेल्या खात्यांची विभागणी यावर आवाज उठविला. आमदार अनिल बोंडे यांनी विदर्भात रोजगाराच्या संधी कमी असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी यांनी राज्य मंत्रिमंडळाची दर महिन्यातील एक बैठक विदर्भातील प्रत्येक जिल्ह्य़ात घेण्याचा आग्रह केला. गोपालदास अग्रवाल यांनीही अन्यायाचा पाढा वाचला. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी शेरोशायरी करून चर्चेत रंगत आणली.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2012 रोजी प्रकाशित
विदर्भाचा आवाज प्रथमच बुलंद
हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा सिंचन घोटाळ्यात सपशेल बुडाल्यानंतर दुसऱ्या आठवडय़ात विदर्भातील लोकप्रतिनिधींना सूर सापडला. विधानसभेत नियम २९३ अन्वये बुधवरी सत्ताधारी आणि विरोधकांनी मांडलेल्या विदर्भावरील चर्चेच्या ठरावानंतर रात्री उशिरापर्यंत घणाघाती चर्चा रंगली. विकासाच्या मुद्दय़ावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पहिल्यांदाच अभूतपूर्व एकजूट दाखविल्याने विदर्भाचा आवाज बुलंद झाला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत एकूण ३२ आमदारांनी चर्चेत मते मांडली. मात्र, यादरम्यान अन्य भागांचे लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना चर्चेत भाग घेण्यासाठी फुरसत नव्हती. त्यांच्या मोठय़ा प्रमाणावरील अनुपस्थितीने नाराजीचा सूर उमटत राहिला.
First published on: 21-12-2012 at 05:48 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sound of vidharbha stentorian first time