मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी ( १६ नोव्हेंबर ) राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात अन्य जातींचा द्वेष निर्माण करण्याचं काम सुरू झालं, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. भाजपाची मदत करायची असेल तर, उघडपणे करावी, असं टीकास्र सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंवर डागलं आहे. राज ठाकरे काय म्हणाले होते? "राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ मध्ये झाली. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातींचा द्वेष निर्माण करण्याचं काम सुरू झालं. प्रत्येकाला आपली जात आवडते. त्यामागे अनेक कारणे असतात. खाद्य संस्कृती हे एक कारण आहे. पण, कुणी इतर जातीचा द्वेष करत नाही. हे राष्ट्रवादीने सुरू केलं," असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. हेही वाचा : “आमच्या पाठीमागे फक्त अन् फक्त…”, ‘त्या’ विधानावरून जरांगे-पाटलांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर "राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांच्याकडून जातीय द्वेष केला जात असल्याचं मी १९९९ नंतर ठाण्यात सांगितलं होतं. त्यामुळे महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणि बिहार होत आहे. राज्यात जातीवाद वाढला आहे. माझ्यासाठी माणूस महत्वाचा आहे. मी कधी जातपात पाहिली नाही," असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं. "आडून मदत करण्यात काहीही अर्थ नाही" यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, "आपल्याला वाटेल तेव्हा कधीही उठावं आणि विधानं करावीत. अशा पद्धतीनं वक्तव्य करणाऱ्यांवर फार बोलू नये. पण, भाजपाची मदत करायची, असेल तर उघडपणे करावी. आडून मदत करण्यात काहीही अर्थ नाही." हेही वाचा : “साहबने बोला हैं हारने को, वर्ल्डकपच्या फायनलमधील संघाला…”, राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य "देवाला विक्रीला ठेवणारे गृहमंत्री आणि पंतप्रधान देशाला लाभत असतील तर." मध्य प्रदेशात भाजपाचं सरकार आणा. आम्ही मोफत रामलल्लाचे दर्शन घडवू, असं विधान गृहमंत्री अमित शाहांनी केलं होतं. यावर बोलताना सुषमा अंधारेंनी म्हटलं, "भारतातील लोक हे देवदर्शन स्वत:च्या पैशाने करू शकत नाहीत का? देवाला सुद्धा विक्रीला ठेवणारे गृहमंत्री आणि पंतप्रधान देशाला लाभत असतील, तर हे मोठं दुर्दैव आहे. हे इतके सर्व ताकदवान झाले आहेत का?"